
महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आहे. नाशिकपासून २८ किमी अंतरावर असलेले हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. ‘सिंहस्थ कुंभमेळा’ हे येथील वैशिष्ट्य आहे. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे संत निवृत्तीनाथांचे समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगमही येथे होतो.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातील प्रमुख रस्ता आहे. दक्षिण बाजूलाही एक छोटा दरवाजा आहे. येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक संपूर्ण भारतातून हजेरी लावतात.

दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे. हे शिवालय हेमाडपंती स्थापत्यशैलीत आहे. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, १९४१ ला ‘महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित समरक’ म्हणून घोषित केले आहे.
मंदिराच्या चारही बाजुना दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश आहेत. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते.
‘नारायण नागबळी’ हा विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केला जातो. याव्यतिरिक्त कालसर्प पुजा, त्रिपिंडी श्राद्ध, कुंभ विवाह, रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप, उत्तरक्रिया, लघुरुद्र व इतर विधी त्र्यंबकेश्वर येथे होतात.