
महाराष्ट्रातील पुण्यापासून ७० किमी अंतरावर ‘कोकणदिवा’ हा एक किल्ला आहे. हा किल्ला रायगड व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे. ‘मुठा’ नदीच्या कडेने ‘घोळ’ गावातून येथे पर्यटक जाऊ शकतात. रायगड किल्ल्यावरील संभाव्य हल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता.
येथून रायगड अगदी झक्कास दिसतो. रायगड हा तेथून अवघ्या सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे. दुर्गदुर्गेश्वर रायगडचे दर्शन येथून टकमक टोकापासून ते भवानी कड्यापर्यंत सुरेख होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे महाराजांची समाधी नुसत्या डोळ्यांनी दिसते. राजवाड्याचे दर्शन देखील नुसत्या डोळ्यांनी होते.

गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. कोकण विभागातील मार्ग खडतर असून सर्वात जवळचे शहर महाड हे मुंबईपासून ६१ किमी अंतरावर आहे. महाडपासून ३२ किमी अंतरावर असलेले ‘सांदोशी’ हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. महाड येथे चांगली हॉटेल्स आहेत. ट्रेकिंगचा मार्ग ‘सांदोशी’च्या उत्तरेला असलेल्या कावळ्या घाटाच्या टेकडीवरून जातो. दुसरा मार्ग पुणे जिल्ह्यातील ‘घोळ’ जवळील ‘गाजरेवाडी’ या गावापासून सुरू होतो. हा मार्ग अतिशय सुरक्षित आणि रुंद आहे. दोन्ही वाटा किल्ल्याच्या उत्तरेकडील एका बाजूला मिळतात. ट्रेकचा मार्ग पुढे पुढे खडतर आहे. पावसाळ्यात येथे चढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ‘गाजरेवाडी’ गावातील ग्रामस्थ माफक दरात रात्रीचा मुक्काम व भोजन व्यवस्था करतात.