भारतीय ॲल्युमिनियम उद्योग
ॲल्युमिनियम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्वपूर्ण उद्योग आहे. या उद्योगाने भारतीय अवजड उद्योगास बळकटी दिली आहे. लोह आणि पोलाद उद्योगानंतर ॲल्युमिनियम उद्योग हा भारतातील दुसरा महत्त्वाचा उद्योग आहे.

ॲल्युमिनियम हा विजेचा सुवाहक असल्याने आधुनिक युगात ॲल्युमिनिअमचा वापर वीजनिर्मिती आणि वितरणासाठी केला जातो. घरगुती भांडी आणि विद्युत उपकरणे, विमान निर्मिती, रेल्वे डबे, आण्विक आणि संरक्षण वस्तू इत्यादीसाठी या धातूचा वापर होतो.
या उद्योगाने 8 लाखाहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या तसेच 4000 हून अधिक लघु तसेच मध्यम उद्योग निर्माण केले असून गेल्या 60 वर्षांत इतर धातूंच्या तुलनेत 6 ते 7 पटीने वाढणारा हा सर्वात वेगवान उद्योग आहे.
बॉक्साईट हा ॲल्युमिनियमच्या उत्पादनात वापरला जाणारा प्राथमिक कच्चा माल आहे. ॲल्युमिनियम उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि उद्योगांना आवश्यक प्रमाणात कच्चा माल उपलब्ध करून देण्यासाठी भारतात ‘नॅशनल मिनरल एक्सप्लोरेशन ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली होती.

ॲल्युमिनियम हा एक हलका पांढरा धातू पृथ्वीवरील सर्वात मुबलक धातू आहे. भारतीय ॲल्युमिनियम उद्योग हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक ॲल्युमिनियम उत्पादनात त्याचा वाटा सुमारे 5.3 टक्के आहे.
देशातील बहुतांश ॲल्युमिनियम उत्पादनात आघाडीच्या पाच कंपन्यांचा वाटा आहे. भारतातील ॲल्युमिनियम उद्योगाची वाटचाल चांगल्या दिशेने सुरु आहे. अलिकडच्या वर्षांत भारताची प्राथमिक ॲल्युमिनियम निर्यात झपाट्याने वाढली आहे.
भारतातील पहिला ॲल्युमिनियम कारखाना ‘आसनसोल-पश्चिम बंगाल’ येथे सन 1937 मध्ये स्थापन झाला. जे. के. ॲल्युमिनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया –’इंडॅल्को’ या नावाने शहरात हा ॲल्युमिनियमचा कारखाना सुरू करण्यात आला.
सन 1938 मध्ये तत्कालीन बिहार राज्यातील ‘मुरी’, केरळ राज्यातील ‘अल्वे’, पश्चिम बंगाल राज्यातील ‘बेलूर’ आणि ओडिशा राज्यातील ‘हिराकुड’ येथे चार कारखाने स्थापन करण्यात आले. हे सर्व कारखाने इंडियन ॲल्युमिनियम इंडस्ट्री-‘इंडल’ या नावाने स्थापन झाले.
‘हिंदाल्को’ या ॲल्युमिनियम कारखान्याची स्थापना सन 1958 मध्ये उत्तर प्रदेशातील ‘रेणुकुट’ नावाच्या ठिकाणी करण्यात आली.
‘नाल्को’ या ॲल्युमिनियम कारखान्याची स्थापना सन 1981 मध्ये ओडिशातील ‘दमनजोडी’ नावाच्या ठिकाणी झाली. फ्रान्सच्या मदतीने ‘नाल्को’ची स्थापना झाली.
‘नॅशनल ॲल्युमिनियम लिमिटेड कंपनी’ असे या कंपनीचे पूर्ण नाव आहे. ‘नाल्को’ हा भारत आणि आशियातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प आहे.
‘माल्को’ हा ॲल्युमिनियम कारखाना तामिळनाडूमधील ‘मत्तूर’ येथे आहे. ‘माल्को’ कारखाना इटलीच्या सहकार्याने उभारण्यात आला आहे. ‘माल्को’चे विस्तारीत नाव मद्रास ॲल्युमिनियम कंपनी असे आहे. या कारखान्यांनी भारताच्या विकासप्रक्रियेत बहुमोल असे योगदान दिलेले आहे.