सूर्यफूल
सूर्याचे अनुसरण करून त्याच्या थेट किरणांच्या दिशेने वळत असल्याने या फुलास ‘सूर्यफूल’ म्हणतात. हे देशातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. हलका रंग, सौम्य चव आणि हृदयाच्या रुग्णांसाठी चांगले असणारे उच्च पातळीचे लिनोलिक ॲसिड यामुळे सूर्यफूल तेल सर्वात लोकप्रिय आहे. सूर्यफुलाच्या बियांमध्ये सुमारे ४८ ते ५३ टक्के खाद्यतेल असते.

सूर्यफूलाचे उत्पादन मुख्यत्वेकरून तेलनिर्मितीसाठी घेतले जाते. साबण व सौंदर्यप्रसाधने करणे तसेच स्वयंपाकासाठी या तेलाचा उपयोग केला जातो. तेल काढल्यानंतर मिळणाऱ्या पेंडीत प्रथिने भरपूर असतात. त्याचा उपयोग गुरे आणि कोंबड्यांचे खाद्य म्हणून केला जातो.
या पिकाला उगवण आणि रोपांच्या वाढीदरम्यान थंड हवामान, रोपांच्या अवस्थेपासून फुलोऱ्यापर्यंत उबदार आणि ढगाळ नसलेले हवामान आणि फुलोऱ्यापासून परिपक्वतेपर्यंत सूर्यप्रकाशाचे दिवस आवश्यक असतात. खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या हलक्या तसेच भारी जमिनीत हे पीक चांगले येते.
जमीन तयार करण्यासाठी तीन ते चारवेळा चांगली नांगरणी करावी लागते. पेरणीपूर्वी माती किमान 10 सेमी खोल ओलसर असावी लागते. मातीच्या ओलाव्यासाठी पेरणीपूर्वी चांगला पाऊस किंवा सिंचन आवश्यक आहे. दर हेक्टरी 8-10 किलो चांगले भरलेले बियाणे आवश्यक असते.

हे बियाणे 12 ते 24 तास आधी भिजवून ठेवल्यावर त्याची उगवणक्षमता वाढते. सेंद्रिय आणि अजैविक अशा दोन्ही खतांमुळे पीक उत्तम जोमाने येते. सूर्यफूल पीक 90 ते100 दिवसात परिपक्व होते. कापणी झाल्यावर वरच्या बाजूला बिया राहतील अशा प्रकारे सूर्यफूल वाळवले जाते. त्यानंतर बियाणे स्वच्छ केली जातात. ही बियाणे चांगले वाळवून गोणीत साठवली जातात. चांगला पाऊस, उत्तम मशागत असल्यास हे पीक उत्तम उत्पादन देते.