
देहू हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान ‘इंद्रायणी’ नदीच्या काठी असून याच गावातून श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, अशी आख्यायिका आहे. येथे पांडुरंगाचा नित्य वास असतो, अशी श्रद्धा आहे. मनाला प्रसन्नता देणारे हे मंदिर एकदा पाहिल्यावर चिरंतन मनात रुंजी घालत राहते.
वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळ्याचे मंदिर, आदि प्रेक्षणीय स्थाने सामावून घेतलेले देहू गाव फार सुंदर आहे. ‘तुकारामबीज’ अर्थात फाल्गुन वद्य द्वितीयेला देहू येथे वार्षिक उत्सव असतो. हजारो भक्तांची मांदियाळी येथे जमलेली असते. विठ्ठलाच्या नामघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेलेला असतो. इंद्रायणी काठी नवीन गाथा मंदिर बांधण्यात आले आहे, हे अप्रतिम आहे. संत तुकारामांचे अभंग लिहून सर्व भिंती भक्तिमय केलेल्या आहेत. संत तुकारामांचा आसनस्थ असलेला फार मोठा पुतळा येथे आहे.
ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली, तो ‘भंडाऱ्याचा डोंगर’ देहूपासून अवघ्या ६ कि. मी. अंतरावर आहे. हा डोंगर भाविकांचे श्रद्धास्थान बनून राहिला आहे. या डोंगरावर जाण्यासाठी थेट पक्का रस्ता आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामांचे अभंग त्यांच्या निंदकांनी बुडवले तो डोहही जवळच आहे. तुकाराम महाराजांच्या आत्मिक सामर्थ्यामुळे हे अभंग पुन्हा वर येऊन तरले होते. ‘तुकाराम बीज’ म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस होय.

मानव असूनही सदेह वैकुंठास जाण्याचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज एकटेच होते. संत तुकाराम महाराज सतत भावावस्थेत असायचे. त्यांची देहबुद्धी अत्यंत अल्प म्हणजेच जीवनातील नित्य कर्मे करण्याएवढीच शिल्लक होती. बाकी सर्व काळ ते हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते.
देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही एक वृक्ष असून त्याचे नाव ‘नांदुरकी’ असे आहे. आजही तो ‘तुकारामबिजे’ला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो. याची अनुभूती हजारो भक्तगण घेतात. वैकुंठ गमनादिवशी या वृक्षाच्या ठिकाणीच तुकाराम महाराज आणि सर्व समाजमंडळी एकत्रित जमली होती.
देहूचे हे चित्र पाहिल्यावर मन अगदी हरखून जाते, भक्तीनादात तल्लीन होते.