
महाराष्ट्रात औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर ‘गौताळा’ अभयारण्य वसलेले आहे. औरंगाबादपासून 65 कि.मी अंतरावर असलेले हे अभयारण्य जैवविविधतेने संपन्न आहे. विविध प्रजातींची हिरवीगर्द वृक्षराजी, मुक्त संचार असणारे विविध प्राणी आणि किलबिलणाऱ्या पक्ष्यांचा अधिवास असलेले 261 चौ.कि.मी.चे हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने दि. 25 फेब्रुवारी 1986 रोजी अभयारण्य म्हणून जाहीर केले. या अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याचे क्षेत्र समाविष्ट आहे.
‘गौताळा घाट’ अभयारण्य ‘कन्नड’ गावापासून 15 कि.मी अंतरावर तर चाळीसगावपासून 20 कि.मी अंतरावर आहे. या अभयारण्यात वाहनाने फिरता येते. तळ्याभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रानशेवगा, कडुनिंब, चिंच असे वृक्ष आहेत. तळ्यात पाणडुबा, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग अनुभवता येतो. साग, चंदन, खैर, सिरस, शिसे, धावडा, पिंपळ, पळस, करवंद, बोर, सीताफळ, अंजन, शेवगा या वनस्पती, प्राणी, पक्षी येथून पाहता येतात.
या अभयारण्यात बिबट्या, लांडगे, चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर, गवे, भेकर असे प्राणी पाहता येतात.

प्रसिद्ध गणितज्ज्ञ भास्कराचार्यांची कुटी, पुरातन मंदिरे, लेणी, महादेव मंदिर, हेमाडपंथी पाटणदेवी मंदिर, सीताखोरे आणि धवलतीर्थ धबधबा अशा विविध स्थळांनी या अभयारण्य परिसराची शोभा वाढविली आहे.
पाटणा येथे निकुंभ राजवंशानी बांधलेले बाराव्या शतकातील पुरातन मंदिर आहे. पुढे एक मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर ‘गौताळा तलाव आहे. हेच नाव या अभयारण्यालाही मिळाले.
येथे गेल्यावर पितळखोरा लेणी, ‘गौताळा’ तलावाच्या पुढे असलेल्या टेकडीवरील गुहेत गौतम ऋषींची दगडी मूर्ती आहे. या गुहेत गौतम ऋषींनी तप केले असे म्हटले जाते. यामुळेच या टेकडीला ‘गौतम टेकडी’ असेदेखील म्हणतात.