मनुका निर्मिती उद्योग
भारत हा कृषीप्रधान देश आहे. द्राक्ष हे येथील महत्त्वाचे फळपीक असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी मागणी आहे. महाराष्ट्र द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहे. द्राक्षांपासून बेदाणा म्हणजेच ‘मनुका’ तयार करणे हा एक चांगला व्यवसाय आहे.

चांगल्या प्रकारचा बेदाणा तयार करण्यासाठी उत्कृष्ट प्रकारचे द्राक्षाचे पीक घ्यावे लागते. सर्व फळांचा आकार सर्वसाधारण सारखा असला पाहिजे. त्याचबरोबर घड तोडण्यापूर्वी फळामध्ये साखरेची गोडी उतरली आहे का, हे तपासून घ्यायला हवे. बेदाण्याच्या आकारातील एकसारखेपणाला गुणवत्तेच्या दृष्टीने महत्त्व आहे. याशिवाय बेदाण्यातील गर हा प्रत वाढवण्यास कारणीभूत ठरतो. बेदाण्याच्या तेजस्वी नैसर्गिक रंग शक्य तेवढा टिकणे आवश्यक असते. हिरव्या द्राक्षापासून बनविलेल्या पिवळसर रंगाच्या बेदाण्यास जास्त मागणी असल्याचे आढळते. बेदाण्यामध्ये चमकदारपणा, लवचिकता म्हणजेच बोटांनी दाबल्यानंतर पुन्हा पूर्ववत आकार देण्याची क्षमता असायला हवी.
साधारण १५ ते २२ दिवसात चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होण्यासाठी चांगली टपोरी फळे निवडावीत. काढलेली द्राक्षे प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. त्यानंतर पोटॅशिअम कार्बोनेट आणि इथाईल ओलिडेट पाण्यात मिसळून त्या द्रावणात 2 ते ४ मिनिटे बुडवून ठेवावीत. या रसायनांचे प्रमाण निश्चित असते. त्यानंतर या द्रावणातून काढलेली द्राक्षे सावलीमध्ये सुकवावीत.
३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमान असल्यास आणि आर्द्रता कमी असल्यास चांगले परिणाम मिळतात. ज्याठिकाणी द्राक्षे वाळवली जाणार आहेत, त्याठिकाणी मोकळी हवा असायला हवी. कोंदट जागेत बेदाण्याची दर्जेदार गुणवत्ता मिळत नाही.

बेदाणे हा प्रक्रिया उद्योग विविध बचत गटांना करता येऊ शकतो. काही द्राक्ष उत्पादक शेतकरीही अलीकडे बेदाणा निर्मितीचा व्यवसाय करताना दिसतात. या प्रक्रिया उद्योगाकरिता कमी भांडवलाची आवश्यकता असते. या उद्योगाकरिता पंतप्रधान योजनेअंतर्गत कर्जसुध्दा मिळते. या प्रक्रिया उद्योगात निर्जलीकरण पंप आणि पाण्याचा पंप अशा यंत्रसामग्रीची आवश्यकता असते. प्लास्टिक ट्रे, प्लास्टिक टब, बादल्या, वजनकाटा, लहान-मोठी भांडी अशा किरकोळ साहित्याची आवश्यकता असते.
बेदाणे सुकविण्यासाठी मोकळी हवेशीर जागेची गरज असते. आपल्याकडे अशी जागा नसल्यास ती भाडेतत्वावर घ्यावी लागते. बेदाणे तयार झाल्यावर ते व्यवस्थित वेष्टनबंद करून विक्रीस न्यावे लागतात.
बेदाणे प्रक्रिया उद्योगास सर्वत्र मोठ्या स्वरूपात बाजारपेठ तयार झालेली आहे. स्थानिक बाजारपेठेतसुध्दा त्यांची विक्री करता येते. किरकोळ दुकानदार, उपहारगृहे, खानावळी, ढाबे, सुका मेवा विक्रेते, बेकरी आदी ठिकाणी या बेदाण्यास मोठ्या प्रमाणात मागणी असते. हा उद्योग सुरु करण्यासाठी साधारण १.५० ते २ लाख रूपये खर्च येतो. हा उद्योग सुरू केल्यास चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.