
नांदेड जिल्ह्यात माहूर हे एक लोकप्रिय धार्मिक क्षेत्र आहे. नांदेड शहरापासून १३० किलोमीटर अंतरावर चारही बाजुंनी जंगलांनी वेढलेल्या या स्थळावर रेणुका देवी, श्री दत्तात्रेय आणि परशुराम यांची देखणी मंदिरे आहेत. ‘माहूरगड’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या माथ्यावर ही मंदिरे आहेत.
माहूरची रेणुकादेवी हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी तिसरे महत्वाचे स्थान आहे. मंदिरासमोरच एक किल्ला आहे. रेणुकामातेला श्री परशुरामाची माता म्हणूनही ओळखले जाते. या क्षेत्राबाबत एक कथा सांगितली जाते.
माता पार्वतीने राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव ‘रेणू’ ठेवण्यात आले. जमदग्नी ऋषीबरोबर तिचा विवाह झाला. जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नी यांच्याकडे कामधेनू मागितली. त्यांनी राजाची मागणी मान्य केली नाही. जमदग्नी यांचा पुत्र पराक्रमी परशुराम आश्रमात नसताना सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला. जमदग्नींना ठार मारून तो कामधेनूस घेऊन गेला.

परशुराम येताच त्यांना घडलेला प्रकार समजला. परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली. पित्याला अग्नी देण्यासाठी योग्य भूमी शोधण्यासाठी तो निघाला. कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव ठेऊन दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले. रानोमाळ भटकत तो माहूरगडावर आला. तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयांनी त्याला भूमी दाखवून येथेच पित्यावर अग्निसंस्कार कर, असे सांगितले. परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नी यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले.
माता रेणुकाच्या आठवणीनी परशुराम शोक करू लागला. तोच ‘तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल.’ अशी आकाशवाणी झाली. त्यावेळी रेणुकामातेचे मुख जमिनीतून वर आले होते. या मुखाचीच माहूरला आजही पूजा होते.
येथे जायचे असल्यास 100 किमी अंतरावर नांदेड विमानतळ आहे. नांदेड शहरातून येथे जाण्यासाठी नेहमी बसची सेवा उपलब्ध असते.