आवाजाची मनस्पर्शी मुसाफिरी – रश्मी वारंग

आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवरील लोकांच्या आवडती रेडिओ जॉकी म्हणजे रश्मी वारंग… गेली १४ वर्षं रश्मी आकाशवाणीवर कार्यरत आहेत. मात्र फक्त रेडिओ जॉकी इतकंच त्यांचं कर्तृत्व नाही. सूत्रसंचालन, निवेदन, पत्रकारिता, अध्यापन, भाषांतरकार, रेडिओ प्रमोशन अशी चौफेर मुशाफिरी त्यांनी केली आहे.

आकाशवाणी हे प्रसारमाध्यमांमधलं एक प्रभावी माध्यम. कितीही नवीन माध्यमांचा शोध लागला तरीही आकाशवाणी किंवा रेडिओ लोकप्रियता कमी झाली नाही. एफएम वाहिन्या सुरु झाल्यानंतर तर या माध्यमाला अजून बहर आला. अशाच एका लोकप्रिय वाहिनीवरची लोकांची रेडिओ जॉकी म्हणजे रश्मी वारंग… गेली १४ वर्ष रश्मी आकाशवाणीवर कार्यरत आहेत. मात्र फक्त रेडिओ जॉकी इतकंच त्यांचं कर्तृत्व नाही. सूत्रसंचालन, निवेदन, पत्रकारिता, अध्यापन, भाषांतरकार, रेडिओ प्रमोशन अशी चौफेर मुशाफिरी त्यांनी केली आहे. आकाशवाणीच्या क्षेत्रातल्या या यशस्वी वाटचालीची सुरुवात रश्मी यांच्या शालेय जीवनापासूनच झाली होती.

मुंबईतील बोरिवलीच्या योजना विद्यालायच्या त्या विद्यार्थिनी. या विद्यालयात अनेक दिग्गज वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यायचे,. त्यामुळे प्रा.राम शेवाळकर, य.दि.फडके, स.गं.मालशे अशा नामवंतांना ऐकायची संधी त्यांना बालवयातच मिळाली. रश्मी यांच्या आईही शिक्षिका होत्या. त्यामुळे त्यांचा भाषेचा अभ्यास अगदी पक्का होता. या अभ्यासाच्या जोरावरच त्यांनी शाळेत असतानाच अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. या क्षेत्रातला त्यांचा शाळेनंतरचा प्रवासही काहीसा मजेदार आहे. त्या आठवणी रश्मी सांगू लागतात, ‘मी मुळात काहीही बंडखोर आहे. एकाच चौकटीत राहून आखीवरेखीव काम करण्यापेक्षा नेहमी काहीतरी वेगळं करायचा माझा प्रयत असतो. मला दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के मार्क होते. असे मार्क म्हणजे विज्ञान शाखा असं समीकरण ठरलेलं. मी मात्र हट्टाने कला शाखा निवडली.’ आपल्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी रुपारेल महाविद्यालयात प्रवेश घेतला. ‘खरं तर अकरावी, बारावी ही दोन वर्ष मी काहीही केलं नाही. कारण कॉलेज आणि शाळा यांची विश्व खूप वेगळी असतात. त्यामुळे मी पहिल्या दोन वर्षात अगदी बावरले होते,’ रश्मी प्रांजळपणे सांगतात. बीएच्या प्रथम वर्षाला मराठीच्या प्राध्यापकांनी दिलेल्या प्रोत्सहानामुळे त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. दोन वेळा राज्यस्तरीय पारितोषिकही जिंकली.

बीएच्या दुसऱ्या वर्षात असताना मराठी साहित्य संमेलन दादरला आयोजित करण्यात आलं होत. तिथे तीन दिवस निवासी स्वयंसेवक म्हणून अगदी उत्साहाने काम केलं. तेव्हा अनेक साहित्यिकांना अगदी जवळून भेटता आलं.’ हे सांगताना रश्मीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान असतं. संमेलनात त्याच्यावर जनसंपर्काची जबाबदारी होती, त्यामुळे त्याची पत्रकारितशी ओळख झाली. हे क्षेत्र जाणून घेण्यासाठी त्यांनी पत्रकारितेचं रीतसर शिक्षण घेतलं.’ या शिक्षणादरम्यान सामान्य माणूस ते सेलिब्रेटी अशा निरनिराळ्या स्तरांमधल्या लोकांशी संपर्क आल्यामुळे बोलणं आणि त्याद्वारे होणारी अभिव्यक्ती याचं बीज कुठेतरी माझ्यात रुजत गेलं.’ , असं त्या सांगतात. बीएच्या अंतिम वर्षाला मराठी साहित्य हा विषय घेतल्यामुळे त्यामुळे वेगवेगळ्या साहित्य प्रकारांना त्यांना हाताळता आलं. थोडक्यात समोर माईक आल्यानंतर श्रोत्यांशी काय बोलायचं या रेडिओ विश्वातील अगदी प्राथमिक समस्येचा प्रश्नच उरला नाही. महाविद्यालयत असताना आपल्या सहकाऱ्यांसोबत त्या ‘स्नेहांकित’ नावाचा व्याख्यानाचा कार्यक्रम करत. त्यांनी स्वखर्चाने केलेल्या या प्रयत्नांना त्या वेळी डॉ.प्रकाश बाळ, सुधीर फडके अशा अनेक नामवंतांनी शाबासकी दिली होती.

कॉलेजमध्ये असताना रश्मी रेडिओवरील ‘युवावाणी’मध्ये कॉफी हाऊस नावाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावयाच्या. पदवीची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी आकाशवाणीच्या एफएम गोल्ड विभागासाठी ऑडिशन दिलं आणि त्यांची निवड झाली. मराठी साहित्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांच्या आकाशवाणीवरचा प्रवासही सुरु झाला. तो रंजक प्रवास सांगताना रश्मी सांगतात, ‘एफएम गोल्डवर निवड झाल्यानंतर मी तिथे इंटर्नशिपसाठी जायचे. तेव्हा अनुराग पांडे, लावण्या, अनिरुद्ध, अनुपम सिंग हे सगळे आजचे लोकप्रिय जॉकी तिथे कार्यक्रम करायचे. त्यांना गाण्याची कॅसेट आणून दे, वाजवलेल्या गाण्याची यादी तरी कर अशी अनेक बारीकसारीक काम मी करायचे. हे करत असताना त्याच्या कार्यक्रमांकडे मी बारकाईने बघायचे. मग हळूहळू प्रत्यक्ष कार्यक्रम करण्याकडे मी मोर्चा वळवला. तेव्हा तिथे स्पूल्स म्हणजे कॅसेटच्या तबकड्या असायच्या. त्यावर स्वतःच्या मेहनतीने बसवलेला कार्यक्रम रेकॉर्ड करावा लागायचा. पण त्यात तांत्रिक अडथळे असत. माझ्याही अशा तीन टेप नाकारल्या गेल्या. अडथळ्यांचा वाटलं तरी हा प्रवास खूप आनंदाचा होता.’ आधी एका आरजेसोबत सहकारी म्हणून काही काळ काम केल्यानंतर त्यांना आकशवाणीवर स्वतंत्र कार्यक्रम करायला मिळाले अन आजतागायत आकाशवाणीवर त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय होत आहेत.

आकाशवाणीवर जम बसल्यानंतर त्यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा झाली. खरं तर आधीच रश्मी मराठी साहित्यात एमए होऊन, यूजीसीची नेट परीक्षा पास होऊन महाविद्यालयात शिकवत होत्या. सोबत साप्ताहिकांमध्ये लेखनही करत होत्या. मात्र त्या दरम्यान त्यांच्या मुलाचा जन्म झाल्यामुळे त्यांनी त्याच्यासाठी तीन वर्ष आकाशवाणीव्यतिरिक्त काहीही न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा मुलगा पहिलीला गेल्यानंतर मग त्यांनी पुन्हा आपल्या करियरकडे लक्ष केंद्रित केलं. एक दिवस त्यांचे सहकारी मयूरेश  शिर्के यांनी ते घेत असलेल्या आवाजाच्या कार्यशाळेत शिकवण्याबद्दल सुचवलं. या कार्यशाळेत काही काळ अध्यापनाचा काम केल्यानंतर मयुरेश यांच्यासोबत त्यांच्या ‘खनक ऍडव्हरटायझिंग ‘ मध्ये रश्मी भागीदार झाल्या. २००९ मध्ये त्यांनी खनकतर्फे आवाजांची कार्यशाळा मोठ्या स्तरावर घ्यायला सुरवात केली. या कल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कारण एकाच कार्यशाळेत सूत्रसंचालन, निवेदन, वृत्तनिवेदन, व्हाईसिंग, डबिंग आणि रेडिओ जॉकी यांचं एकत्रित प्रशिक्षण मिळायला लागले. आबालवृद्धांमध्ये ही कार्यशाळा लोकप्रिय झाली अन  आजही होतेय.

२०१० सालात मराठी गाण्यांमध्ये लोकप्रियतेबाबत एक वाद झाला होता. एका हिंदी रेडिओ जॉकीने मराठी गाणी कमी लोकप्रिय असतात, असं जाहीर केल्यामुळे अनेक श्रोत्यांनी रश्मी यांना याबाबत काहीतरी करण्यासाठी सुचवलं. रश्मी यांचे रेडिओ माध्यमातलेच सहकारी मयूरेश शिर्के आणि गणेश आचवल यांच्या मनात एक कल्पना आली. त्यानी आपले रेडिओ जगतातले अनुभव शब्दबद्ध करायचं ठरवलं. खरं तर, हे त्या वादावरचं प्रत्युत्तरच होतं . अनुभव शब्दबद्ध झाल्यानंतर त्या पुस्तकाला ‘मनस्पर्शी’ असं नाव देण्यात आलं . ‘मनस्पर्शी’च्या प्रकाशन सोहळ्यावेळी वाचकांना पुस्तकात नेमकं काय आहे. हे कळावं म्हणून लेखकांच्या मुलाखतीचा छोटा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यावेळी उपस्थित असलेल्या सगळ्यांच ही कल्पना आवडली. तेव्हा मग आम्ही मनस्पर्शीचे जाहीर कार्यक्रमही घ्यायला लागलो. अर्थात, हे सर्व श्रोत्यांच्या प्रेमामुळेच शक्य झाल्याचं त्या कृतज्ञतेने सांगतात. आकाशवाणी, आवाजाची कार्यशाळा, खनक, मनस्पशीं यांच्यासोबत त्या आता रेडिओ प्रमोशनही करतात.

आजही रश्मी यांची घोडदौड सुरु आहे. काही जणांना बहुआयामी कर्तृत्वाची आस असते, अशांपैकी एक रश्मी वारंग आहेत. आपल्या शैक्षणिक जीवनातही त्या बीए आणि एमए पदवी परीक्षांमध्ये सुवर्ण पदक विजेत्या आहेत. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा तोल सांभाळत त्यांनी आजवर वाटचाल केली आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *