जवस
‘जवस’ हे एक तेलबिया पीक आहे. याद्वारे तैलरंग, सौम्य साबण, छपाईची शाई बनविली जाते. वंगण, मलम यासाठीही ‘अळशी’च्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड गुरांच्या सकस खाद्यासाठी आणि खत म्हणून वापरली जाते. या तेलाचा उपयोग दुभती जनावरे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात.

जवसाला मराठीत ‘अळशी’, गुजराथीत ‘अलसी’, हिंदीत ‘अलसी’ किंवा ‘तिसी’, कानडीत ‘अल्सी’ आणि ‘आलसी’; तर संस्कृतमध्ये ‘अलसी’, ‘अतसी’, ‘अतसिका’, ‘हैमवती’, ‘मदगंधा’, ‘मलीना’, असेही म्हणतात.
भारतात जवस हे रब्बी पीक आहे. याच्या एका फळात दहा टोकदार चकचकीत चपट्या बिया असतात. त्या बियांपासून तेल निघते. विदर्भात जवसाचे तेल खाद्यपदार्थांमध्ये वापरतात.
‘जवस’ हे समशीतोष्ण प्रदेशातील रोप आहे. जवसाच्या बियांची भुकटी करून चविष्ट चटणी करतात. खोडाच्या अंतर्सालीपासून एक धागा निघतो या धाग्यापासून कापड, दोरी, रस्सी बनविली जाते. जवसाच्या बियांपासून तेल निघते. चीनमध्ये जवसाचे सर्वांत जास्त उत्पादन घेतले जाते.

जवस लागवडीसाठी ओलावा टिकवून ठेवणारी मध्यम ते भारी जमीन आवश्यक असते. जमिनीची योग्य मशागत करावी लागते. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड करणे चांगले असते. लागवडीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे लागते. जवस आणि हरभरा, जवस आणि करडई किंवा जवस आणि मोहरी अशाप्रकारे आंतरपीक घेता येते. जवसाचे उत्पादन हेक्टरी सात क्विंटल मिळते.