
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यातील सागरकिनारे मनमोहक आहेत. येथील काही किनाऱ्यांवर पर्यटकांची वर्दळ असते. काही किनारे आल्हाददायक असूनही शांत आहेत. काही किनाऱ्यांवर कोळ्यांची वर्दळ असते. असाच येथील दाभोळी – वायंगणी किनारा आहे. येथे कोळ्यांची लगबग सुरु असते. उतार असलेल्या किनाऱ्यावर लाटांचा फेस, त्याची गाज अनुभवता येते. एखादी होडी वगळली, तर सगळा किनारा मस्त निवांत असतो.

वेंगुर्ल्याच्या उत्तरेला हा अतिशय सुंदर, गर्दी नसल्याने स्वच्छ आणि शांत सागरतीर आहे. किनारा अगदी छोटासाच असला, तरीही तो नितांत सुंदर आहे. येथून सूर्यास्ताच्या विविध रंगछटा पाहता येतात. सागर पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येतो. ज्यांनी हा किनारा पाहिला त्यांना वेंगुर्ल्यात आल्यावर येथे भेट दिल्यावाचून जावेसे वाटत नाही, यातच त्याचे खरे सौंदर्य दडले आहे.