विमान निर्मिती उद्योग
भारतात विमान वाहतूक सेवा अगदी उत्तम चालते; पण प्रत्यक्ष विमान निर्मिती येथे होत नाही, हे भारताचे फार मोठे दुर्दैव आहे. भारतीय विमान कंपन्या परदेशातून विमाने आयात करतात. ‘बोईंग’ या विदेशी कंपनीची स्थापना सन १९१६ मध्ये झाली. ‘एअरबस’ची स्थापना सन १९७० मध्ये आणि ‘दासो’ची स्थापना सन १९२९ मध्ये झाली. अर्थात, या सगळ्या कंपन्या बऱ्याच जुन्या आहेत. त्यांच्याकडे विमाने बनविण्याचा अनुभवदेखील आहे, परंतु जगातील मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत यात कुठेच नाही.

सन १९८० मध्ये भारतात विमानांच्या उत्पादनाला सुरुवात झाली होती. दुर्दैवाने, भारत अजून एकही मोठे विमान बनवू शकलेला नाही. जगातील एकूण विमान उत्पादनामध्ये भारताचे योगदान नाही. लष्करी विमाने वगळता भारतात विमान उत्पादन होत नाही. सन १९४० मध्ये वालचंद हिराचंद यांनी ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’ची स्थापना करून विमान उत्पादनास भारतात सुरुवात केली असल्याचे संदर्भ मिळतात.
सन १९४२ मध्ये महायुद्धाच्या काळात ही कंपनी तत्कालीन शासनाने आपल्या ताब्यात घेतली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कंपनीची मालकी भारत सरकारकडे आली. या कंपनीत सध्याच्या रशियाकडून परवाने घेऊन विमाने बनवली जातात; मात्र यात फक्त लष्करी विमानेच बनवली जातात.
स्वातंत्र्योत्तर भारतात नियंत्रणवादी धोरणानुसार, उद्योजकांना प्रत्येक उत्पादनाकरिता शासकीय परवानगीची गरज असायची. भारताची वाढती लोकसंख्या आणि विमान सेवाक्षेत्रातील वाढ विचारात घेतली, तर भारतात विमान वाहतूक बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळे विमान निर्मितीला भारतात वाव आहे; मात्र यात भारतासमोर युनायटेड स्टेट्स, चीन आणि जपान या देशांचे आव्हान आहे.
देशातील बहुतांश विमान कंपन्या या ‘बोईंग’, ‘एअरबस’, ‘एटीआर’ आणि ‘एम्ब्रेर’सारख्या परदेशी विमान निर्मात्यांनी तयार केलेली विमाने खरेदी करतात. देशात विमानाची निर्मिती होऊ शकत नाही, असा सरकारी पातळीवरील समाज नव्या उद्योजकांसाठी मारक ठरत आहे.

भारताची सरकारी कंपनी ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ विमाने तयार करण्यास सक्षम आहे, परंतु ती केवळ लष्करी तंत्रज्ञानापुरती मर्यादित आहे. भारतात हुशारी, क्षमता आणि तंत्रज्ञानाचा अभाव आहे, म्हणून येथे या कंपन्या नसाव्यात, असा याचा अर्थ बिलकुल नाही.
सन २००४ मध्ये स्वदेशी विमानाने बेंगळुरूमध्ये पहिले उड्डाण केले, परंतु विमानाच्या वजनाची मर्यादा आवश्यकतेपेक्षा अधिक असल्याने उड्डाणादरम्यान ते कोसळले. त्यानंतर दुसरे ‘सारस प्रोटोटाइप’ विमान बंगळुरूच्या भागात चाचणी उड्डाणादरम्यान जमिनीवर कोसळले. या चाचणीत भारतीय वायुसेनेचे दोन पायलट आणि एक उड्डाण चाचणी अभियंता ठार झाले, तेव्हापासून हा प्रकल्प अर्धवट स्थितीत आहे.
भारतात विमान निर्मिती उद्योग उभारण्याची, ते विकसित करण्याची राजकीय इच्छाशक्ती फार कमी पडते. विमानाचे सुटे भाग तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संसाधनांचा अभाव आहे. यासाठी आवश्यक असलेले घटक आयात करण्यासाठी भारतावर व्यापार निर्बंध आहेत. हा उद्योग महागडा, मोठी गुंतवणूक करण्याचा आणि वेळखाऊ आहे. यामुळेही गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास सहजासहजी राजी होत नाहीत. अशा अनेक कारणांमुळे भारतात विमान उद्योग भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही भारतात विकसित झालेला नाही.