उष्माघातापासून स्वतःला वाचवा
वातावरण कमालीचे तप्त झाले आहे. तापमानात वाढ होत आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अशा वेळी उष्माघाताचा त्रास होऊन शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर मृत्यू होण्याचाही संभव असतो. अशावेळी आपली काळजी आपणच घेतली पाहिजे.

उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते. त्यावेळेस उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळावे. आपल्याजवळ आवर्जून पाण्याची बाटली ठेवावी. पाणी भरपूर प्यावे. तहान लागण्याची वाट बिलकुल पाहू नये. दररोज ८ ते १० ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, लिंबूपाणी तसेच ओआरएसची भुकटी पाण्यात मिसळून घ्यावी. आहारमध्ये काकडी, संत्री, कलिंगड, लिंबू, कांदा यांचा भरपूर वापर करावा. बाहेर जाणे अत्यावश्यक असल्यास पुरेशी काळजी घेऊनच जावे. शक्यतोवर रणरणत्या उन्हात कामासाठी बाहेर पडू नये. सकाळी-संध्याकाळी सौम्य सूर्यकिरणे असताना बाहेरच्या कामांना प्राधान्य द्यावे. सैल, सुती, सौम्य रंगांचे, अंगाला न चिकटणारे ढिले कपडे वापरावेत. जीन्स आणि भडक कपडे या दिवसात वापरणे टाळावे. डोक्यावर टोपी घालावी, कानाला आणि डोक्याला रुमाल किंवा स्कार्फ बांधावा, छत्रीचा वापर करावा.
अनेक तास सतत कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर उष्मापात होतो. बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. ही जीवघेणी अवस्था आहे. प्रखर तापमानाला सामोरे गेल्यावर शरीरातील उष्णतेचे संतुलन करणारी संस्था निकामी होते. अतिउष्णतेने शरीरातील प्रथिनांवर दुष्परिणाम होतो. पेशींमधली जीवनप्रक्रिया थांबते. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. उपचाराभावी मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती बेशुद्ध होण्याची व दगावण्याची शक्यता असते. शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात. उष्माघात हा प्रामुख्याने नवजात बाळ, लहान मुले, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो.

मळमळ, चक्कर येणे, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे आणि स्नायूंना आकडी येणे अशी लक्षणे जाणवतात. घाम बाहेर पडत नाही त्यामुळे त्वचा गरम आणि कोरडी होते. नाडीची आणि श्वासाची गती वाढलेली असते. शरीरात ताठरता येते. हात आणि पाय आखडतात. मृत्यूसुद्धा ओढवू शकतो
शरीरातील जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच यावर प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम व्यक्तीला वातानुकूलित जागेत, सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे. शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्याच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवावी. बर्फ उपलब्ध असल्यास व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या सांध्यात बर्फाने शेक देण्यास सुरुवात करावी. थंडाव्यामुळे शरीराचे उष्णतामान कमी व्हायला मदत होते. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. अंग ओल्या कापडाने पुसून घ्यावे. व्यक्तीवर पाण्याचा वर्षाव करावा. व्यक्ती शुद्धीवर आल्यानंतर त्यास पाणी पिण्यास द्यावे.