मसाले उद्योगातून प्रगती
स्वयंपाकात वापरले जाणारे नेहमीचे पदार्थ आर्थिक मिळकत करून देतात. फक्त त्या पदार्थांकडे त्यादृष्टीने पहावे लागते. दौंड तालुक्यातील खुटबावमधील कमलताई शंकर परदेशी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी मसाला उद्योगामध्ये मोठी झेप घेतली. शेतीमध्ये मोलमजुरी करणाऱ्या या महिलांनी स्वतःच्या कार्यक्षमतेवर स्वतःचा रोजगार निर्माण केला आहे.

त्यांनी सुरुवातीला ‘अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्थे’ची स्थापना करून त्याद्वारे मसाले बनविण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे जवळपास 32 प्रकारचे घरगुती मसाले तयार होतात. उच्च गुणवत्तेमुळे त्यांना बाजारपेठही चांगली मिळत आहे. या महिला आधी शेतात मोलमजुरी करीत होत्या. पुढे महिलांचा गट स्थापन करण्याचे ठरवून त्यांनी 10 निरक्षर महिलांना एकत्र आणले. कमल शंकर परदेशी, स्वाती मनोहर चव्हाण, शोभा पुंडलिक कांबळे, रेखा राजेंद्र सकट, चंद्रकला सुरेश चव्हाण, लक्ष्मीबाई दिगंबर फणसे, सिंधूबाई आनंदा जाधव, सिंधूबाई रामभाऊ गदादे, राणी सतीश वाघमारे, सुशीला अंकुश खरात या महिला यात कार्यरत आहेत.
पंचायत समितीत सन 2004 मध्ये ‘अंबिका महिला बचत गटा’ची नोंदणी केली. प्रत्येक महिला महिन्याला 100 रुपये बॅंक खात्यात जमा करू लागली. 3 महिन्यांत 3 हजार रुपये जमा झाले. या भांडवलातून त्यांनी मसाला उद्योग सुरू केला. तत्कालीन गटविकास अधिकारी राजेंद्र पोकरे यांनी त्यांना अन्य मसालेनिर्मितीचे प्रशिक्षण घेण्यास सुचविले. एका महिलेकडून या महिलांनी तसे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला चक्क झोपडीवजा घरात त्या मसाले करू लागल्या. परिसरातही भरतगाव, खुटबाव, यवत परिसरातील 8 बचत गटांच्या महिलांना त्यांनी संघटित केले. तेव्हा 103 महिलांची ‘अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्था’ स्थापन केली. राष्ट्रीय बॅंकेने त्यासाठी कर्ज दिले.

कमलताई म्हणतात, ”मसाले तर बनविले, पण विक्री कशी करायची हे ठाऊक नव्हते. पंचायत समिती, तहसील कार्यालयाच्या बाहेर विक्री सुरू केली. दुपारच्या सुट्टीत तेथील अधिकाऱ्यांना मसाले दाखविले. अनेक कारणांमुळे अनेकांनी नापसंती दाखविली. तसा तसा बदल करीत गेलो. नंतर उत्तम प्रतिसाद मिळू लागला.
त्यांनी मुंबईत ‘महालक्ष्मी सरस’ या बचत गटांच्या प्रदर्शनात पाच किलो कांदा-लसूण मसाला विकला. विक्रीचा अनुभव त्यांच्या गाठीशी आला. मसाला विक्रीसाठी त्या थेट दादरला जाऊन पोहोचल्या. गर्दीच्या ठिकाणी उभ्या राहून त्या माल विकू लागल्या. दर 10-15 दिवसांनी 12 ते 15 किलो मसाला मुंबईला नेऊन विकण्याचे गणित ठेवले. मसाल्याच्या वेष्टनावर संपर्क क्रमांक असल्याने अनेकजण मोबाईलवरून मागणी करू लागले. अशांना कुरिअरने घरपोच सेवा दिली. सन 2006 मध्ये ‘दख्खन जत्रा प्रदर्शना’सारख्या अनेक प्रदर्शनांत सहभागी झाल्या.
या महिला पुणे बाजार समितीतून कच्चा माल घाऊक दरात घेतात. धने शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. प्रशिक्षणाप्रमाणे मसाले तयार करण्यासाठी त्यांच्याकडे जिन्नस प्रमाण आणि कृतीची वही आहे. गुणवत्तेसाठी एका दिवसात एकच प्रकारचा मसाला तयार केला जातो. यासाठी त्या यंत्रसामग्रीचा वापर करतात. हे काम करीत असताना त्या प्रत्येकाची मजुरी बाजूला काढतात. कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, गोडा मसाला, मटण मसाला, गरम मसाला, छोले मसाला, चहा मसाला, पावभाजी आणि सांबार मसाला असे अनेक प्रकारचे मसाले त्या बनवतात. आकर्षक वेष्टणबंद करून बाजारात विक्रीसाठी पाठवितात. त्यांनी अन्नभेसळ परवाना घेतला असून जिल्हा उद्योग केंद्राकडे नोंदणीही केली आहे. त्या पारंपरिक पद्धतीने मसाला बनवितात. त्यामुळे त्यांना ग्राहकही चांगले लाभले आहेत.