सुगंधित बासमती
बासमती तांदूळ जगभरात प्रसिद्ध आहे, एवढेच नव्हे, तर जागतिक बाजारपेठेत या धान्याला मागणी आहे. भारत आणि पाकिस्तान हे देश बासमती तांदूळाचे जनक मानले जातात. भात हे जगातील महत्त्वाच्या अन्नधान्य पिकांपैकी एक आहे. जगात सुमारे 150 दशलक्ष हेक्टर आणि आशियामध्ये 135 दशलक्ष हेक्टरमध्ये भाताची लागवड केली जाते.

भारताच्या समुद्रकिनारील राज्यांमध्ये भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार आणि अलीकडे कृत्रिमरीत्या सिंचनाच्या सोयी सुविधांमुळे पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश या राज्यातही भाताची लागवड केली जाते. भारत हा बासमती तांदूळांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. भारत दरवर्षी ३० हजार कोटींहून अधिक किंमतीचा बासमती तांदूळ निर्यात करतो.
बासमती तांदूळाची जागतिक मागणी आणि त्याची निर्यात क्षमता लक्षात घेता बासमती भातशेती अत्यंत महत्त्वाची बनली आहे. मे महिन्यापासून शेतकरी बांधव भाताच्या लागवडीची तयारी सुरू करतात. भात हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. शेतकऱ्याला या पिकापासून चांगले उत्पादन घ्यायचे असेल, तर त्याने सुरुवातीपासूनच काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. बासमती तांदूळ हा तांदळाच्या सर्वोत्कृष्ट जातींपैकी एक आहे. हा तांदूळ त्याचा अनोखा सुगंध आणि चवीमुळे जगभर ओळखला जातो. बासमती तांदूळाच्या अनेक जाती आहेत. बासमती भातलागवडीसाठी शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे; जेणेकरून त्यांची उत्पादकता वाढू शकेल. धान्याची उत्पादकता वाढवायची असेल, तर माती आणि हवामानाचा योग्य विचार करून वाण निवडणे सर्वांत महत्त्वाचे आहे.

सुधारित तंत्रज्ञानानुसार, बासमतीचे विविध गुण लक्षात घेऊन अनेक जाती करण्यात आल्या आहेत. मान्यताप्राप्त वाणांमध्ये ‘कस्तुरी’, ‘बासमती 198’, ‘बासमती 217’, ‘बासमती 370’, ‘बासमती 385’, ‘बासमती 386’, ‘कर्नल कस्तुरी’, ‘माही सुगंध’, ‘पुसा’, ‘रणबीर’, ‘तरोरी’ यांचा समावेश आहे. यामध्ये ‘बासमती-370’, ‘बासमती-385’ आणि ‘बासमती-रणबीर सिंगपुरा’ आणि इतर संकरित वाण आहेत.
बासमती भातशेतीसाठी चांगली पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेली गुळगुळीत किंवा चिकणमाती योग्य आहे. भातशेतीसाठी 2 ते 3 वेळा नांगरणी करावी लागते. यासोबतच शेताला मजबूत कुंपण घालावे लागते. या प्रक्रियेद्वारे पावसाचे पाणीही जास्त काळ शेतात साठवता येते. दुसरीकडे हिरवळीचे खत म्हणून ‘धिंच’ आणि ‘सनई’ वापरतात. भाताची पेरणी करण्याआधी शेताला एक आठवडा आधी पाणी द्यावे लागते. शेतात खुरपणी केल्यानंतर पेरणीच्या वेळी शेतात पाणी भरून नांगरणी करावी. रोपवाटिका लागवड करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे; अन्यथा, काही भातबिया निरुपयोगी असल्याने त्याचा त्रास होऊ शकतो. जातीनुसार बासमतीसाठी हेक्टरी 25 ते 30 किग्रॅ. बियाणे पुरेसे असते.