ज्वारी लागवड
भारतातील ज्वारीच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी 50% क्षेत्र महाराष्ट्रात आहे. देशातील एकूण ज्वारी उत्पादनापैकी 52% उत्पादन महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये होते. ज्वारी हे खरीप आणि रब्बी पीक आहे. हे कोरडवाहू शेतीप्रकारातील सर्वात महत्वाचे अन्न आणि चारा पीक आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू ही ज्वारी पिकवणारी प्रमुख राज्ये आहेत. इतर राज्ये प्रामुख्याने चाऱ्यासाठी कमी प्रमाणात ज्वारीची लागवड करतात.
ज्वारीचे धान्य प्रामुख्याने मानवी अन्न म्हणून वापरले जाते. ज्वारीची भाकरी बनवितात. काही ठिकाणी ती भाताप्रमाणे शिजवली जाते. ज्वारीचा हिरवा आणि सुका चारा देशभरातील गुरांचे महत्त्वाचे खाद्य आहे. ज्वारीचा पशुखाद्य म्हणूनही वापर होतो. ज्वारीची झाडे उच्च तापमान आणि दुष्काळ सहन करू शकतात. ज्वारीचे पीक कोरड्या प्रदेशात घेतले जाते. उत्तर प्रदेश, राजस्थान, बंगाल आणि बिहारच्या दमट प्रदेशातही याची लागवड होते. या पिकांसाठी 15 अंश सेल्सिअस ते 40 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असते.
ज्वारीच्या पिकाला फेरपालटीची आवश्यकता असते. त्याकरिता ज्वारीच्या पिकाची कडधान्याच्या पिकाबरोबर फेरपालट करणे जास्त उपयुक्त ठरते. यामुळे जमिनीच्या वनस्पतीपोषक द्रव्यांचे शोषण होत नाही. कडधान्याच्या मुळांवरील गाठींमुळे त्या पिकाखालच्या जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण वाढून नंतर त्याच जमिनीत ज्वारीचे पीक चांगले येते. उत्तर भारतात बार्ली, गहू अगर भात आणि वाटाण्यानंतर ज्वारी पेरतात, तर मध्य व दक्षिण भारतात कापूस अगर कडधान्याच्या पिकाबरोबर ज्वारीच्या पिकाची फेरपालट करतात. बागायती ज्वारीची फेरपालट मिरची, तंबाखू, भुईमूग वगैरे पिकांबरोबर करतात.

ज्वारीचे पीक मिश्र पीक म्हणून अगर स्वतंत्रपणे घेतात. उत्तर आणि मध्य भारतात ते तूर, जवस किंवा करडईबरोबर, तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तमिळनाडू राज्यांच्या काही भागात चवळी, तूर, उडीद, मूग, मटकी किंवा कुळीथाबरोबर मिश्र पीक म्हणून घेतात. काही शेतकरी ज्वारीबरोबर गवार अगर अंबाडीचेही पीक घेतात. रब्बी ज्वारीत हरभऱ्याचे मिश्र पीक घेतात.
ज्वारीचे पीक वर्षाच्या जवळजवळ सर्व हंगामात घेतले जाते. उत्तर भारतात हे खरीप हंगामात घेतले जाते; परंतु दक्षिण भारतात हे पीक रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते. खरीप पिकाची पेरणी मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर लगेच जवळजवळ जूनच्या शेवटच्या आठवड्यात करावी. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणीची सर्वोत्तम वेळ असते. रब्बी ज्वारीची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात केली जाते. खात्रीशीर पाणीपुरवठा असल्यास सुधारित वाणांचे धान्य उत्पादन 25 – 35 क्विंटल प्रति हेक्टर आणि गवत किंवा कारवीचे उत्पादन 150 – 170 क्विंटल प्रति हेक्टर दरम्यान असते.