
रत्नागिरीतील दापोलीपासून जवळ असणारा केळशीचा समुद्रकिनारा अप्रतिम आहे. सुट्टीचे दिवस मनमुराद व्यतीत करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. कोकणातील खऱ्या ग्रामीण जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल, तर केळशी हे उत्तम ठिकाण आहे. केळशी समुद्रकिनारा २.५ किलोमीटर पसरलेला असून येथून सूर्यास्त पाहणे प्रेक्षणीय आहे.
येथील ‘महालक्ष्मी मंदिर’ आणि ‘याकूब बाबा’ दर्गा’ प्रसिद्ध आहे. केळशीच्या मुख्य गावाच्या गल्लीत एक सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. केळशीमध्ये दरवर्षी अनेक महत्त्वाचे सणही साजरे केले जातात, जे आजही जुन्या परंपरा जपतात. केळशीमध्ये हॉटेल्स आणि कॉटेज उपलब्ध आहेत. येथील स्वच्छ वाळू आणि त्यावर खेळणाऱ्या समुद्राच्या लाटा पाहत रहावेसे वाटते. का किनाऱ्याला नैसर्गिक पार्श्वभूमी आहे. विविध वनस्पती आणि जीवजंतू पाहण्यासाठी येथे अभ्यासप्रेमी येतात.

केळशीचा किनारा पर्यटकांच्या गर्दीपासून आजपर्यंत दूर आहे. दापोलीपासून सुमारे ३३ किमी अंतरावर असणारा हा किनारा मुळ कोकणाचे दर्शन घडवतो. हा किनारा नारळी-सुपारीच्या बागांनी वेढलेला आहे. गोंगाटापासून दूर असलेला स्वच्छ आणि सुंदर किनारा आहे. येथे कासवांचेही दर्शन घडते. येथे विविध स्थलांतरीत पक्षी येतात.