रंगीबेरंगी लिली
अन्नधान्याची शेती ही भारतात परंपरेने चालत आलेली शेती आहे. माणूस सजावटीबाबत विशेष दक्ष झाला आहे. त्याच्या अभिरुची बदलल्या आहेत. त्यामुळे भारतासह जगभरात शोभेच्या फुलांची मागणी सातत्याने वाढत आहे. शेतकऱ्यांसमोर फुलशेती हा एक नवा पर्याय म्हणून उदयास आला आहे. फुलशेती दिसायला आकर्षक तर असतेच; त्याहीपेक्षा यातून शेतकरी भरपूर कमाईही करत आहेत.

‘लिली’ हे एक विदेशी शोभेचे फूल असून ते अनेक रंगात येते. भारतातील शेतकरी त्याची लागवड करून उत्पन्नाचे नवे दरवाजे उघडत आहेत. लिली हे विदेशी फूल असले, तरी ते भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. शेतकरी वर्षभर त्याचे उत्पादन घेतात.
‘पॉली हाऊस’मध्ये याची लागवड करावी लागते. आपल्या देशात त्याची व्यावसायिक लागवड फारच कमी प्रमाणात केली जात आहे. सध्या आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशातील शेतकरी लिलीच्या फुलांची लागवड करतात. त्याशिवाय महाराष्ट्रातही त्याची लागवड केली जात आहे.
लिलीची लागवड तीन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात ऊती संवर्धन प्रक्रियेद्वारे रोपवाटिका तयार केली जाते. हे काम मोठ्या प्रयोगशाळा किंवा कंपन्यांमध्ये केले जाते. दुसऱ्या टप्प्यात रोपवाटिका म्हणजेच रोपांची लागवड केली जाते. या झाडांना कंद येतात. तिसऱ्या टप्प्यात ते कंद कुंडीत लावले जातात. अशाप्रकारे शेतकऱ्यांना लिलीची फुले मिळतात.

डोंगराळ प्रदेशातील हवामान लिलीसाठी अनुकूल आहे. अशा भागात राहणारे शेतकरी उघड्यावरही लिलीची लागवड करू शकतात. मैदानी भागात लिलीच्या लागवडीसाठी ‘पॉली हाऊस’ची आवश्यकता असते. ‘पॉली हाऊस’मध्ये प्रत्यारोपणासाठी 2.5 किलो कोकोपीट, 2.5 किलो गांडूळ खत, 2.5 किलो स्ट्रॉ आणि 5 किलो कोळसा राख आवश्यक असते. त्यानंतर या मिश्रणात रोपे लावली जातात. मग शेतकऱ्यांना कंद मिळतात. कंद विकसित होण्यासाठी तीन महिने लागतात. या काळात, चांगली काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी ठिबक सिंचनाची शिफारस केली जाते. 3 महिन्यांनी कंद तयार होतो. मुळासोबतच कंद उपटला जातो. शेतकऱ्यांना हवे असेल, तर कंद विकूनही मोठी कमाई करता येते. कंद विकायचे नसतील, तर ते कुंडीत लावतात. फुले उमलल्यावर त्यांची थेट विक्री करतात.
कंद लावणीनंतर लगेच पाण्याची फवारणी करणे आवश्यक असते. 7 दिवसांनंतर, ‘पॉली हाऊस’चे तापमान 20 ते 25 अंशांवर निश्चित करण्याचा सल्ला दिला जातो. कंद लावल्यानंतर 30 दिवसांनी हिरवी कळी दिसून येते आणि लवकरच फुले येतात. भारतात लिलीची लागवड फार कमी प्रमाणात केली जाते. यामुळे कंपन्या शेतकऱ्यांशी आगाऊ करार करतात. या आगाऊ कराराचा फायदा शेतकऱ्यांना होतो.