
मुंबई शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला पालघर जिल्हा म्हणजे निसर्गसौंदर्याचे अप्रतिम दर्शन आहे. ‘नागरी’, ‘डोंगरी’ आणि ‘सागरी’ अशा तिन्ही प्रकारची भौगोलिकता या जिल्ह्यास लाभली आहे. ‘जव्हार’ हा या जिल्ह्यातील काहीसा दुर्लक्षित, दुर्गम असा भाग आहे. पावसाळ्यात हा परिसर मन वेडावून सोडतो. दाट धुक्याची दुलई, गार हवा आणि कोसळणारा पाऊस असे वातावरण येथे अनुभवायला मिळते. जिल्ह्यातील आदिवासी वस्ती असणाऱ्या पर्यटनस्थळांमध्ये ‘जव्हार’ अग्रेसर आहे. सह्याद्रीचे डोंगर, टेकड्या आणि दऱ्याखोऱ्यांनी हा परिसर व्यापलेला आहे. जव्हार समुद्रसपाटीपासून ५०० मीटरपेक्षाही अधिक उंच आहे.
‘जव्हार’ ला लागूनच मोखाडा, सूर्यमाळ, खोडाळा ही ‘हिल स्टेशन्स’ लक्षवेधी आहेत. पावसाळ्यात डोंगरातून कोसळणारे कित्येक धबधबे मन मोहित करतात. जव्हार हे वारली चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे. ‘जव्हार’ मध्ये जुन्या राजवाड्याजवळ श्री मुक्तेश्वर महादेव मदिर असून या मंदिराजवळील झऱ्याला ‘बाणगंगा’ म्हणून ओळखतात. या मंदिरालाही ‘बाणेश्वर महादेव मंदिर’ म्हणून ओळखले जाते. संस्थानकाळात स्वत: राजे येथे दर शिवरात्रीस महादेवाची महापूजा बांधत असत. या मंदिरातील पूजा राजघराण्याकडून होत असे.

या मंदिरासमोर असलेल्या वृक्षाच्या ढोलीतील खोडाला गणपतीच्या सोंडेचा आकार आल्याने तो पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. ‘जयविलास पॅलेस’ हा राजवाडा या जिल्ह्यामध्ये आहे. या राजवाड्यात ‘मुकणे’ घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत. याशिवाय जुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
‘जव्हार’ मध्ये जातानाच ‘नारळीदरा’ ही दरी पहायला मिळते. त्यात अनेक छोटे-मोठे धबधबे वाहत असतात. जव्हारचा ‘हनुमान पॉईंट’ प्रसिद्ध आहे. ‘दाभोसा’ धबधबा हे येथील मुख्य आकर्षण आहे. या धबधब्यातील पाण्याचे तुषार सुमारे १०० फूट उंचीपर्यंत उडतात. या धबधब्याशिवाय इथे ‘हिरडपाडा’ धबधबाही आहे. अलीकडेच येथे ‘खडखड’ धरणही बांधण्यात आले आहे. येथे जायचे झाल्यास इगतपुरी, नाशिक किंवा डहाणू रेल्वेस्थानकावर उतरून पुढे जाता येते. इगतपुरी-जव्हार हे अंतर ६१ कि.मी. आहे. नाशिकपासून जव्हारचे अंतर ८० कि.मी. तर मुंबईपासून जव्हारचे अंतर १८० कि.मी.आहे.