
कोल्हापूरमध्ये ‘कोटीतीर्थ’ नावाचे एक जुने आणि छान देवस्थान आहे. शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या ‘शाहू मिल’जवळ एक मोठा तलाव असून या तलावात हे लहानसे मंदिर आहे. येथील निसर्गसौंदर्य अनुपम आहे. ‘एक रमणीय स्थान’ म्हणून या मंदिराकडे पहिले जाते. या तलावामध्ये महादेवाचे छोटे मंदिर आहे. हे मंदिर साधे आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती आहे.
समोरील बाजूस अलीकडच्या काळात बांधलेला मंडप असून मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंडी आहे. मंदिराच्या दक्षिण बाजूला आमराई आहे. नारायणदास महाराजांनी सन 1894 मध्ये बांधलेल्या इमारतीच्या मुख्य दिवाणखान्याच्या खालील लहानशा खोलीत समाधी आहे. इमारतीसमोर एक छोटा घाट असून याच्या पायऱ्या तळ्य़ाच्या पाण्यापर्यंत गेल्या आहेत.

असुरांनी देवांवर विजय मिळवला असताना महालक्ष्मीने देवांच्या मदतीस धावून जात एक कोटी असुरांना येथे ठार मारल्याने या जागेला ‘कोटीतीर्थ’ असे नाव मिळाले, अशी कथा सांगितली जाते. महालक्ष्मीनेच येथे कोटीश्वर लिंगाची स्थापना केली, असेही म्हणतात. काहीजण कोल्हापुरात आल्यावर प्रथम कोटीतीर्थाचे दर्शन घेतात. येथे पूर्वी श्री महालक्ष्मीचे मंदिर होते. ते भूकंपात जमीनदोस्त झाल्याचीही समजूत आहे. या कोटीतीर्थाजवळ श्री स्वामी समर्थ मंदिर असून ते शांत आणि रमणीय आहे.