
कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणाला यांत्रिक प्रक्रियेतून चालना देण्याकरिता ‘महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादीत’ ची स्थापना करण्यात आली. सन १९६५ मध्ये ‘कंपनी अधिनियम १९५६’ अंतर्गत या संघटनेची स्थापना झाली.
हे महामंडळ महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेतीमध्ये उच्च उत्पादकता प्राप्त करण्यासाठी सहाय्य करीत आहे. शेतक-यांना उच्च प्रतीची खते, किटकनाशके उपलब्ध करून देण्याचे कार्य हे महामंडळ करते. शेतकऱ्यांना कृषी अभियांत्रिकी अवजारे, पशुखाद्य आवश्यक प्रमाणात, वेळेवर आणि किफायतशीर दरात उपलब्ध करून देणे हे या महामंडळाचे काम आहे. या महामंडळामार्फत दाणेयुक्त मिश्रीत खतनिर्मिती केली जाते.

हे खत कारखाने पाचोरा-जळगाव, जालना, नांदेड, वर्धा, कोल्हापूर आणि रसायनी (रायगड) येथे स्थित आहेत. ‘महाराष्ट्र किटकनाशके मर्यादीत’ ही या महामंडळाची सहाय्यक कंपनी आहे. या सहाय्यक कंपनीचे कारखाने अकोला आणि रत्नागिरीतील ‘लोटे परशुराम’ येथे आहेत. महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी, कोल्हापूर, नाशीक, जळगाव, पुणे, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे प्रादेशिक कार्यालये आहेत. ठाणे आणि मुंबई जिल्ह्यासाठी ठाणे सहाय्यक प्रादेशिक कार्यालय आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे हे महामंडळ ‘राज्य नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्त केल्या गेली आहे.
हे महामंडळ उद्योजकांना प्रकल्प तयार करण्यास आणि क्षेत्र निवडण्यास मदत करते. नागपूरजवळ ‘बुटीबोरी’ येथे फूड पार्क देखील विकसीत केले आहे. महामंडळाची कृषी अभियांत्रिकी कार्यशाळा चिंचवड-पुणे येथे आहे. येथे कृषी अवजारे तयार केली जातात. महामंडळाचा पशुखाद्य निर्मिती कारखाना चिंचवड-पुणे येथे आहे. सध्या हे महामंडळ मुंबईत फुलांचे लिलाव केंद्र स्थापन करण्याच्या प्रक्रियेत व्यस्त आहे.