
मुंबईजवळील टिटवाळा गावात सिद्धिविनायक महागणपती मंदिर असून येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. कल्याण-कसारा मार्गावर ‘काळू’ नदीच्या काठावर हे जागृत मंदिर आहे. टिटवाळा येथील गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील 8 प्रसिध्द गणपती मंदिरापैकी एक आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. या परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम होता. शकुंतला इथे वाढली. त्यामुळे या ठिकाणाला एक प्राचीन महत्त्व आहे.
गणपतीचे मंदिर साधेच आहे. शेंदरी रंगाची रेखीव मूर्ती मंदिरात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेते. सिंहासनावर विराजमान असलेल्या या मूर्तीच्या 4 हातात आयुधे आहेत. डोक्यावर चांदीचा मुकुट आणि चांदीचे छत्र आहे. इथे नेहमी फुलांची सुरेख आरास केलेली असते. गणपतीच्या गाभाऱ्यात चांदीचा बारीक कलाकुसर आहे. सभामंडपात अनेक धार्मिक विधी, वाचन सुरु असते. मंदिराच्या आवारात एक छोटी दीपमाळ आहे. मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या ‘कसारा’, ‘आसनगाव’ आणि ‘टिटवाळा’ या गाड्यांनी या मंदिरापर्यंत जाता येते. स्थानकापासून हे गाव थोडे दूर आहे; मात्र तेथे बससेवा उपलब्ध आहे. हे देउळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली असल्याची आख्यायिका आहे. हे मंदिर एका सरोवरात बांधले होते. गाळ साचून मंदिर त्यात गाडले गेले. माधवराव पेशवे यांनी दुष्काळादरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी या तळ्याचे उत्खनन केले होते. त्यादरम्यान हे मंदिर जसेच्या तसे सापडले, आणि देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली. वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाचे पुनरुत्थान करवले आणि मूर्तीची पुनर्स्थापना केली, असा इतिहास सांगितला जातो.