
उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्या की चाकरमान्यांना कोकणातील गावी जाण्याचे वेध लागते. गरमीचे दिवस असल्याने रेल्वेगाड्यांची तिकिटे आरक्षित करावी लागतात; परंतु यादिवसात तिकिटेही मिळत नाहीत. यासाठीच मध्य रेल्वेने कोकणासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यास सुरूवात केली असून, ‘पुणे-रत्नागिरी’ आणि ‘पनवेल-रत्नागिरी’ या साप्ताहिक गाड्या सोडण्यात येत आहेत. पुणे आणि पनवेलमधून रत्नागिरीसाठी या साप्ताहिक विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.
‘पुणे-रत्नागिरी’ ही गाडी ४ मे ते २५ मे या कालावधीसाठी धावणार आहे. ही गाडी दर गुरूवारी पुण्यातून रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी रवाना होईल ती रत्नागिरीत शुक्रवारी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी दर शनिवारी दुपारी १ वाजता रत्नागिरीतून सुटेल. त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल. या गाडीला लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रस्ता आणि संगमेश्वर रस्ता हे थांबे आहेत.

‘पनवेल-रत्नागिरी’ ही गाडी ५ ते २६ मे या कालावधीत सोडली जाणार आहे. ही गाडी दर शुक्रवारी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी पनवेलहून सुटेल. ती रत्नागिरीला शनिवारी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. रत्नागिरीहून ही गाडी शुक्रवारी दुपारी १ वाजता सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. या गाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रस्ता आणि संगमेश्वर रस्ता हे थांबे आहेत. एकूण १६ गाड्या सोडण्यात येणार आहेत.