महाबळेश्वरला होणार मंत्रिमंडळ बैठक
महाबळेश्वर येथे मे महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीच्या तयारीच्या अनुषंगाने राजभवन येथील दरबार हॉल येथे सातारा जिल्ह्यातील सर्वच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीसाठी येणारे सर्व मंत्री या बैठकीसाठी महाबळेश्वरला मुक्कामी सहकुटूंब असणार आहेत. याबरोबरच प्रत्येक विभागांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आदी महाबळेश्वर येथे येणार आहेत. या सर्वांची भोजन, निवासाची उत्तम व्यवस्था महाबळेश्वर येथे केली जाणार आहे. यावेळी करमणुकीचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बैठकीच्या निमित्ताने दरबार हॉल सजविण्याबरोबरच महाबळेश्वरकडे जाणारे रस्ते खड्डेमुक्त करून सुशोभित करण्यात यावेत अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत. शहर सुशोभीकरण-सौंदर्यीकरण कारण्याबाबतच्या सूचनादेखील या बैठकीत पालिकेच्या प्रशासक पल्लवी पाटील यांना केल्या आहेत. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून खबरदारीची सूचना करण्यात आली. जनरेटरची व्यवस्था तसेच इंटरनेट व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला.

यावेळी मंत्र्यांच्या निवास व्यवस्थेची देसाई यांनी पाहणी केली. या बैठकीच्या अनुषंगाने सातारा जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाबळेश्वर येथे मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री देसाई यांनी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कारकिर्दीत राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक महाबळेश्वर येथे पार पडली होती. अशीच एक बैठक पुन्हा महाबळेश्वर येथे घेण्याची तयारी शिंदे-फडणवीस सरकारने प्रस्तावित केले आहे.