राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा
रत्नागिरी येथे आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यानिमित्ताने मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांची रत्नागिरीमधील ही पहिली सभा आहे. त्यामुळे ते काय बोलतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास मनसेला एखादे मंत्रिपद मिळू शकते असे माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले होते. बच्चू कडू यांचे हे वक्तव्य आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील जवळीक यामुळे आजचे त्यांचे भाषण राजकीय वर्तुळात महत्त्वाचे मानले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी अलीकडेच परस्परांच्या भेटी घेतल्या होत्या. म्हणूनच, त्यांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.