कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे लवकरच सुशोभिकरण
कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा ‘अमृत भारत योजने’अंतर्गत विकास कर, तसेच कोकण रेल्वेसाठी पुन्हा 28 किलोमीटरचा सर्व्हे स्वतंत्रपणे करावा लागणार असून त्यासाठी प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी यांनी दिली.

राजर्षी शाहू महाराज टर्मिनसच्या पाहणीसाठी कौल्हापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पृथ्वीराज महाडिक, अरिहंत फाऊंडेशनचे जयेश ओसवाल यांनी प्रवाशांच्या वतीने लालवाणी निवेदन देण्यात आले.
”कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. फर्निचरबरोबरच गाडीचे कोणते डबे कोणत्या ठिकाणी उभे करावेत, यासाठी जागा निश्चित केली जाईल. कोरोनामुळे अनेक मार्गावरील बंद झालेल्या रेल्वेगाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. याबाबत लक्ष दिले जाईल,” असेही त्यांनी सांगितले. मात्र, ज्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद आहे, अशा मार्गांवर कामाचा भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही विषय धोरणाशी निगडित असून त्यासाठी तरतूद करावी लागते. त्याबाबत संबंधित विभागांशी चर्चा करावी लागेल, असेही ते म्हणाले.

यावेळी उपमहाव्यस्थापक इंदुराणी दुबे, वाणिज्य महाव्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, रेल्वे सल्लागार समितीचे अध्यक्ष शिवनाथ बियाणी, सत्यजित कदम आदी उपस्थित होते.