तांदूळ गिरणी उद्योग
ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी कुटुंबातील तरूणांना तांदूळ गिरणी उद्योग कसा सुरू करायचा, याविषयी निश्चित माहिती असेल. या उद्योगाद्वारे ग्रामीण भागातील उद्योजकांबरोबरच शहरी भागातील व्यक्तीनाही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून कच्चा माल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून तो माल शहरातील व्यापाऱ्यांना विकता येतो.

भारताच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून या लोकसंख्येला त्या प्रमाणात अन्नधान्याची गरज आहे. भारताची लोकसंख्या एक अब्जाच्या पुढे गेली असली, तरी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवण्यासाठी भारत हा सक्षम आणि स्वयंपूर्ण देश आहे. भारत गहू, मका, तांदूळ, ज्वारी निर्यात करतो. भारत हा साखर निर्यातीचा प्रमुख पुरवठादार आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, बंगाल या राज्यांमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
पारंपरिक पद्धतीत शेतकरी उकळत्या पाण्यात भात गरम करून घेत. भाताचे कांडप करून सालापासून तांदूळ वेगळा काढला जात असे. आज आधुनिकीकरणाच्या युगात प्रत्येकजण कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळत नाही. तरुणींचे लग्न निश्चित करताना शेतकरी मुले नाकारली जातात. पगारदारांना प्राधान्य दिले जाते. याच कारणामुळे थोडेफार शिक्षण झाल्यावर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तरुणाई शहरात येऊ लागली. नोकरी लागल्यानंतर हा तरुण शहरात राहू लागला.
या कारणास्तव, शहरी – निमशहरी भागात, मोठ्या महानगरांमध्ये मुख्य अन्नधान्य असलेल्या तांदूळासारख्या धान्यांना मोठी मागणी आहे. तांदूळ गिरण्यांमध्ये दररोज हजारो टन धान्यावर प्रक्रिया केली जाते. भात त्याच्या ग्रेडनुसार वेगळे केले जाते. त्यानंतर तांदूळ ग्राहकांच्या मागणीनुसार 5 किलोपासून 50 किलोपर्यंतच्या पिशव्यांमध्ये भरला जाऊन विक्रीस पाठविला जातो.

‘बासमती’, ‘जिरगा’, ‘इंद्रायणी’, ‘आंबेमोहर’ , ‘जया’ , ‘रत्नागिरी’ , ‘कोलम’ , ‘घनसाळ’ हे तांदळाचे प्रमुख मागणी असलेले वाण आहेत. शेतकऱ्यांकडून बाजारभावानुसार सालासह तांदूळ खरेदी करून तो तांदूळ गिरण्यांमध्ये आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. अनेक गिरणीमालक विशिष्ट प्रजातीचा तांदूळ खरेदी करतात. त्यावर प्रक्रिया करतात आणि विशिष्ट नावाने ब्रँड करून बाजारात विकतात. या पद्धतीत जास्त फायदा होतो.
कमी किमतीत तांदूळ खरेदी करणे आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करून तो तुमच्या नावाच्या ब्रँडखाली बाजारात आणणे, हे फायदेशीर आहे. अधिकाधिक गिरणी व्यापारी या पद्धतीचा वापर करतात.
हा बारा महिने चालणारा व्यवसाय आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व किराणा दुकानात तांदूळ विकला जातो. त्यासोबतच मोठमोठे मॉल्स, सुपर मार्केट, किरकोळ आणि घाऊक धान्याचे व्यापारी यांना त्यांच्या मागणीनुसार माल देऊ शकतात.
आठवडी बाजार आणि तांदूळ प्रात्यक्षिके येथे माल विकू शकता. हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये याठिकाणी मागणीनुसार वस्तू विकू शकतात. तांदूळ विकण्यासाठी ग्राहक शोधण्याची गरज नाही. ‘बासमती’, ‘इंद्रायणी’, ‘कोलम’, ‘रत्नागिरी-24’, ‘आंबेमोहर’, ‘जया’, ‘जिरगा’, ‘घनसाळ’ या तांदूळाला बाजारात मागणी आहेत. यासाठी आपणास भात कांडप यंत्र, मोठी भांडी, पिशव्या, कामगार यांची गरज लागेल.