
खानदेशातील ‘उनपदेव’ या तीर्थक्षेत्रावर भाविकांची सदैव गर्दी असते. जळगाव जिल्ह्यातील ‘चोपडा’ शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. वैशिष्ट्य म्हणजे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी हे तीर्थक्षेत्र प्रसिद्धीस पावले आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले हे क्षेत्र म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. येथे असलेल्या स्नानकुंडाच्या वरील बाजूला शरभंग ऋषींची पुरातन गुंफा, श्री महादेव, श्री गणपती, श्रीराम-लक्ष्मण-सीतामाई आणि हनुमान यांची मंदिरे आहेत.
विविध प्रकारच्या दुर्मिळ वनौषधी वनस्पती या परिसरात पाहता येतात. सर्प, हरिण, मोर, तडस, निलगाय, लांडोर आदि पशुपक्ष्यांचा येथे मुक्त संचार असतो. हे तीर्थक्षेत्र प्रभू श्रीराम आणि श्री शरभंग ऋषींच्या पदस्पर्शाने पुनीत झाले आहे. येथे गोमुखातून वाहणारे गरम पाणी सतत वाहत असते. पाण्याची उष्णता कमी-जास्त होत नाही, यामुळे पर्यटक अचंबित होतात.

प्रभू रामचंद्र 14 वर्षे वनवास भोगत असताना येथे आले होते. त्यावेळी त्वचारोगाने पीडित शरभंग ऋषींसाठी बाण मारून श्रीरामांनी या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली असल्याची अख्यायिका आहे. या गरम पाण्याने आंघोळ करून शरभंग ऋषींना पूर्ववत शरीर प्राप्त झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. सातपुड्याच्या पर्वतरांगामधील गंधकाच्या साठ्यातून या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती झाली आहे. गंधक हे त्वचारोगावरील उपचारांस उपयुक्त असल्याने त्वचारोग नाहीसे करण्यासाठी लोक येथे आवर्जून येतात. संपूर्ण पौष महिन्यात येथे यात्रा भरते. महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, गुजरात येथील भाविक या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे उत्सवकाळात स्थानिकांनाही रोजगार मिळतो. या तीर्थक्षेत्रास शासनाने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे.