
मणिपूरमधील हिंसाचार शांत करण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या लष्कर आणि आसाम रायफल्सने आतापर्यंत सुमारे 23,000 नागरिकांची यशस्वीरित्या सुटका करून त्यांना लष्करी छावण्यांमध्ये हलवले आहे. लष्कराने हवाई पाळतही वाढवली आहे. बचावकार्य सुरू झाल्यापासून राज्यात हिंसाचाराची कोणतीही मोठी घटना घडलेली नाही.
लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, बचावकार्य सुरू झाल्यापासून हिंसाचाराची कोणतीही मोठी घटना घडली नाही, परिणामी संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यानंतर अनेक राज्ये आपल्या लोकांना बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. रविवारी नागालँडमधील ६७६ नागरिकांना सुरक्षा दलांनी मणिपूरमधून सुरक्षितपणे बाहेर काढले. मणिपूरमध्ये शिकणारे 208 त्रिपुराचे विद्यार्थी त्यांच्या राज्यात परतले आहेत. इंफाळ विमानतळावर 21 इतर विद्यार्थी घरी परतण्याची वाट पाहत आहेत. आंध्रप्रदेशने आपल्या 100 विद्यार्थ्यांना बाहेर काढले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मणिपूरमध्ये अडकलेल्या राज्यातील 22 विद्यार्थ्यांना प्रथम आसामला पाठवले जाईल. तेथून त्यांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली जाईल. मिझोराममधील ४५ विद्यार्थीही सुखरूप घरी पोहोचले आहेत. आसाम रायफल्सने राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडच्या १८८ कर्मचाऱ्यांची यशस्वीरित्या सुटका करून त्यांना मिझोराममध्ये सुरक्षित स्थळी नेले आहे.”

केंद्रीय राखीव पोलीस दल प्रमुख कुलदीप सिंग यांची सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर) आशुतोष सिन्हा यांची संपूर्ण ऑपरेशनल कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव विनीत जोशी यांना मणिपूरचे मुख्य सचिव करण्यात आले आहे. गेल्या 24 तासात लष्कराने हवाई निगराणी वाढवली आहे.
इंफाळ खोऱ्यात लष्कराच्या हेलिकॉप्टर आणि ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे. केंद्र सरकार मणिपूरमधील युद्धखोर गटांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्यास तयार आहे, असे केंद्रीय ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी हैदराबाद येथे सांगितले. राज्याचे पोलीस महासंचालक पी. डोंगल यांनी सांगितले की, सुरक्षा दलांच्या हस्तक्षेपानंतर राज्यातील परिस्थिती सुधारली आहे.