
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. मणिपूरमध्ये अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार असून तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना मणिपूरहून आसाममध्ये आणण्यात येईल. मणिपूरहून आसामपर्यंत आणताना या विद्यार्थ्यांना विशेष सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी आसाम आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना त्यांनी दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्राचे अनेक विद्यार्थी मणिपूरच्या ‘एनआयटी’, ‘आयआयटी’ मध्ये शिक्षण घेत असून यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. महाराष्ट्र सरकार मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
त्यापूर्वी या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता. यावर तातडीने पावले उचलत देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. मणिपूरमधील परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती त्यांनी मणिपूर सरकारला केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनीही मणिपूरच्या पोलीस महासंचालकांशी याबाबत संपर्क साधला आहे.