वकील उज्ज्वल निकम यांचा राजकीय नेत्यांना सल्ला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पार पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशाचे लक्ष लागून राहिले आहे. आज न्यायालय हा ऐतिहासिक निकाल देणार आहे. या निकालाचे परिणाम राजकारणावर होणार आहेत. मात्र ‘या निकालानंतर घोडेबाजार करू नये’, असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांना दिला आहे.

नागपूर शहरात आयोजित एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
ॲड. निकम म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कुणाच्याही बाजूने लागू शकतो. मात्र, १५ आमदारांवर निकाल येईपर्यंत टांगती तलवार नक्की असेल.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अनेक दिवस सुनावणी सुरू होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर १४ फेब्रुवारी ते १६ मार्च यादरम्यान सलग सुनावणी झाली होती.