शेतकऱ्याच्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
जळगाव तालुक्यातील महानिर्मितीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने जलपुनर्भरणाची संकल्पना सुचवणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले होते. या पत्राची दखल घेत दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्याशी संपर्क साधून ही संकल्पना व्यवस्थित समजून घेतली.

डोंगरकठोरा येथील रहिवासी पुरुषोत्तम ठोमरे हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते सध्या शेती करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ हा कार्यक्रम ते नियमित ऐकतात. यादरम्यान त्यांनी जलपुनर्भरणाबाबत सुचवलेली संकल्पना पंतप्रधान कार्यालयास मेलद्वारे कळवून नंतर पत्रदेखील पाठवले. यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान कार्यालयातून थेट पुरुषोत्तम ठोमरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. जलपुनर्भरणाची त्यांची नेमकी संकल्पना, त्याचा फायदा याविषयी समजून घेण्यात आले.

पावसाळ्यात येथील नदीला पूर आल्यानंतर अतिरिक्त पाणी पात्रातून वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी दोन्ही बाजुंनी नदीपात्रातून वरील भागात वळवावे. ठराविक अंतरानंतर वळवलेले पाणी पुन्हा नदीपात्रात सोडता येईल, अशी व्यवस्था करावी म्हणजे ते उताराच्या दिशेने खाली जमिनीत पाझरेल. वाहून जाणारे पाणी वाया न जाता ते वळवलेल्या भागात जमिनीत जिरून भूजल पातळी वाढेल, अशी शेतकरी ठोमरे यांची संकल्पना आहे. दरम्यान, थेट देशाच्या पंतप्रधान कार्यालयातून साधलेल्या संपर्कामुळे शेतकरी ठोमरे हे भारावून गेले आहेत.