शालेय गणवेशाबाबत कापड व्यापाऱ्यांचा विरोध
शालेय शिक्षणासंबंधी सरकारकडून गणवेशाविषयी घेण्यात आलेल्या प्रस्तावित नियमाला कापड व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे. विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचा गणवेश सरकारमार्फत पुरविल्यास कापड व्यापाऱ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे हा निर्णय घेऊ नये, अन्यथा व्यापारी आत्मदहन करतील, असा इशारा अहमदनगर होलसेल व्यापारी गारमेंट असोसिएशन आणि शिवराष्ट्र सेना या संघटनेने दिला आहे. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून व्यापाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाच प्रकारचा, एकाच रंगाचा गणवेश शिवण्यासाठी राज्य पातळीवरून कापड पुरविण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे. शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी तसा निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयामुळे सध्या व्यापाऱ्यांकडे शिवून पडलेल्या तयार कपड्यांचा साठा तसच पडून राहील. सर्वच दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात करोडो रुपये खर्च करून गणवेश तयार करून घेतले आहेत. यासाठी अनेकांनी कर्जही काढले आहे. नव्या पद्धतीने गणवेश पुरवठा झाला तर हा माल कोणीही घेणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. व्यापाऱ्यांना आत्महत्येला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

अहमदनगर होलसेल व्यापारी गारमेंट असोसिएशन आणि शिवराष्ट्र सेना या पक्षाचे व्यापारी आघाडी अध्यक्ष विजय पितळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंत्र्यांची भेट घेतली. यामध्ये निखील गांधी, पारस कासवा, बाबुशेठ चूग, प्रकाश सराफ, संतोष गुगळे, संकेत गांधी, राजेश आहुजा, प्रदीप आहुजा, नवनाथ मोरे अरुण चव्हाण परदेशी असे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
हा निर्णय सरकारने मागे घ्यावा; अन्यथा शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने कापड बाजार व्यापारी होलसेलला पाठिंबा देऊन आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.