ठाणे शहरात नळजोडण्यांवर जलमापके
पाण्याचा होणारा बेसुमार वापर थांबावा, देयकांची वेळेत वसुली व्हावी या उद्देशाने ठाणे महापालिकेने शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत हे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित २० टक्के काम येत्या 6 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जलमापके बसविण्यात आलेली नसल्यामुळे पाणी वापर नेमका किती होतो, याचा अंदाज पालिका प्रशासनाला येत नव्हता. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेतला होता. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर जलमापके बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली.
नळजोडणीधारकांना यंदाच्या आर्थिक वर्षात जलमापकांच्या नोंदीप्रमाणे देयक आकारले जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण १ लाख १३ हजार ३२८ जलमापके बसविण्यात येणार आहेत. गृहसंकुलांच्या ठिकाणी आतापर्यंत ९५ हजार ५०० जलमापके बसविण्यात आली आहेत. काही रहिवाशांना जलमापकाप्रमाणे देयके पाठविण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीला त्रुटी आढळून आल्या होत्या. याबाबत तक्रारी आल्यानंतर पालिका प्रशासनाने त्यात दुरुस्ती केली.

शहरातील लोकमान्य नगर, कोपरी, आनंद नगर, बाळकुम, वाघबीळ, ओवळा, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये काही ठिकाणी जलमापके बसविण्याची कामे शिल्लक आहेत. चाळी आणि झोपडपट्टी भागात पाण्याचा बेसुमार वापर केला जातो. घरासमोरील रस्ते आणि वाहने पाण्याने धुणे असे प्रकार सुरू असतात. शहरातील इमारतींमध्ये घरांच्या क्षेत्रफळानुसार पाणी देयकांची आकारणी केली जाते.