कशेडी घाटातील बोगद्याचे काम पूर्णत्वास
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम ऑक्टोबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. राज्यातील ग्रामीण रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा चव्हाण यांनी घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

या बोगद्यातून एकेरी वाहतूक येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुलभ होणार आहे. या बोगद्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना वेळ वाचणार आहे. बोगद्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले असून पावसाळ्याच्या सुरुवातीला जूनमध्ये या बोगद्यातून एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील रस्त्यांच्या कामाबाबत येणाऱ्या अडचणींचा आढावा त्यांनी घेतला. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणींचाही त्यांनी आढावा घेतला. परशुराम घाटात कोसळलेली माती काढून काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.