
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशचा एकदिवसीय दौरा केला. येथील चौपदरीकरण होत असलेला किरातपूर-मनाली महामार्ग चाचणी म्हणून १८ मे पासून सुरु होणार असल्याची सुखद वार्ता त्यांनी यावेळी दिली.
कुलू येथील जिल्हा मुख्यालयाच्या ‘मौहल’ विश्रामगृहावर पोहोचल्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष भीमसेन शर्मा यांनी अनुराग ठाकूर यांचे खास टोपी, मफलर आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अनुराग ठाकूर यांनी स्थानिक लोकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षाला पुढे नेण्यासाठी आणि सरकारची धोरणे व कार्यक्रम जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्तेच काम करतात.
राज्यातील पर्यटनवाढीविषयी बोलताना ते म्हणाले, ”प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कुलुमनालीला पोहोचतात. आता येथे किरातपूर-मनाली महामार्गाचे काम वेगाने सुरू असून त्याचे बरेच काम पूर्ण झाले आहे. जून महिन्यात त्याचे उद्घाटन व्हावे यासाठी आमचा प्रयत्न आहे.”
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 18 मे पासून चाचणी म्हणून हा मार्ग खुला करण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून कुलु-मनालीला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सोय होईल. त्याचबरोबर राज्यातील जनतेचीही मोठी सोय होऊ शकते.