अडुळसा लागवड
अडुळसा ही भारतामध्ये सर्वत्र आढळणारी आणि कडू गुणधर्माची औषधी वनस्पती आहे. नैसर्गिक अवस्थेमध्ये अडुळसा फार कमी प्रमाणात मिळत असल्याने त्याची शेतात लागवड करणे महत्त्वाचे आहे. अडुळशाचे झाड 5 ते 8 फूट उंच वाढते. त्याची पाने 10 ते 15 सेंटिमीटर लांब असतात.

अडुळशाची पांढरी फुले गुच्छस्वरूपात येतात. अडुळशाची फळे बोटाच्या आकाराची असून त्यामध्ये 4 बिया असतात आणि पिकल्यावर त्या फुटतात. अडुळशाची लागवड छाट कलम किंवा बियांपासून करतात. अडुळशाच्या पानांचा आणि मुळाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो.
अडुळसा ही वनस्पती सदैव हिरवीगार असते. खोडाला समोरासमोर फांद्या येतात. पेर फुगलेली असून पांढरी असतात. मुख्यतः पावसाळ्यात लागवड केली जाते. कुंपणाच्या कडेला, शेतजमिनीच्या बांधावर याची लागवड केली जाते. मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी छाट कलमांचा वापर करून प्लॅस्टिक पिशवीमध्ये रोपे तयार केली जातात. या वनस्पतीवर रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत नाही. जूनच्या शेवटचा आठवडा ते जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात लागवड केल्यास या पिकाची वाढ चांगली होते. पानांची किंवा फुलांची काढणी गरजेनुसार झाडाच्या पानाच्या प्रमाणानुसार करावी. साधारणतः तिसऱ्या महिन्यापासून पाने काढणीसाठी तयार होतात. त्यानंतर 1 ते 2 महिन्यांच्या अंतराने छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर पाने, फांद्या, फुले ही सावलीत वाळवावीत. संपूर्ण वाळल्यानंतर त्याची पावडर करावी. आयुर्वेदिक औषधात अडुळशाचा वापर केला जातो.
अडुळसा पानांचा फुलांसहित रस काढून मधासोबत घ्यावा. कितीही दिवसांचा दमा, खोकला असला तरी तो दूर होतो. कावीळवर अडुळशाच्या पानांचा फुलासहित रस काढून त्यामध्ये खडीसाखर आणि मध घालून घ्यावे.

कप, खोकला यावर अडुळसा, गुळवेल आणि रिंगणी यांचा काढा मध घालून घ्यावा. अडुळशाची पाने जंतुनाशक असतात. त्यामुळे ते पाण्यात टाकल्यास पाणी खराब होत नाही, तसेच धान्यामध्ये ठेवल्यास कीड लागत नाही.
शेतामध्ये पानांचा उपयोग खत म्हणून देखील करता येतो. अडुळशाच्या पानांचा लेप सुजनाशक, जंतुनाशक, वेदनाशामक असून त्वचारोगावर उपचार करतात. अडुळशाच्या वाढीला पोषक हवामान आणि जमीन असल्यास 2 वर्षात झाडांची वाढ 2.5 ते 3 फूट होते. अडुळशाच्या झाडाची पाने, फळे आणि मुळे वेगळी करून सावलीत सुकवावीत. प्रत्येक भाग वेगळा ठेवून त्याची पावडर करावी. अडूळशाच्या पानांचे उत्पादन प्रति एकरी 2 ते 3 टन मिळते. अडुळसा मुळ्यांचे उत्पादन 200 ते 300 रुपये किलोने मिळते. वनस्पतींच्या ताज्या भागांचा वापर करायचा असल्यास प्रक्रिया केंद्रात पाठवणी जातात. थंड आणि कोरड्या जागेत याची साठवण करावी.