छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना सतर्कतेचे आदेश
छत्रपती संभाजीनगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सतर्कतेचे आदेश जारी केले आहेत. नुकतीच त्यांनी सर्व ठाणे प्रमुखांची बैठक घेतली. येणाऱ्या काळात पोलिसांनी सतर्क रहावे, अशा सूचना देऊन शहराच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथकाच्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असल्याने त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या दोन्ही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण पहायला मिळाले. अशा घटनांचे पडसाद छत्रपती संभाजीनगर शहरात उमटू नयेत, म्हणून शहर पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. येणाऱ्या काळात पोलिसांनी अति दक्ष असावे, त्यासंदर्भातील सूचना लोहिया यांनी या बैठकीत दिल्या.

गेल्या काही दिवसांत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किरकोळ कारणावरुन 2 गटांमध्ये वाद होण्याच्या घटना सतत घडताना पहायला मिळत आहेत. काही ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून, छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.