जी-20 ऊर्जा संक्रमण कार्यगटाची बैठक मुंबईत सुरु
भारताच्या अध्यक्षतेखाली ‘जी-20’ ऊर्जा संक्रमण कार्यगटाची तिसरी बैठक मुंबईत सुरु झाली असून ही बैठक 3 दिवस चालणार आहे. सन २०३० पर्यंत अक्षय उर्जेची क्षमता ५०० गिगावॅटपर्यंत पोहोचविण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याचे उर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार यांनी सांगितले. बैठकीदरम्यान आलोक कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत ६ मुद्द्यांवर प्राधान्याने चर्चा होणार असून या दरम्यान ८ विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच उर्जा क्षेत्रातील भागधारकांदरम्यान माहितीची देवाणघेवाण होईल, असेही आलोक कुमार यांनी सांगितले. कोळसा सचिव अमृतलाल मीनासुद्धा या बैठकीला उपस्थित होते.

अक्षय ऊर्जेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मिश्र ऊर्जेचा वाटा वाढविण्याच्या दृष्टीने सरकार नियोजन करीत आहे. त्याचा आराखडा लवकरच तयार केला जाईल, असे अमृतलाल मीना यांनी सांगितले. आज देशातील एकूण ऊर्जेपैकी ७० टक्के ऊर्जा कोळशापासून मिळते. सन २०३० पर्यंत कोळशाची मागणी दीड अब्ज टनापर्यंत वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यगटाच्या बैठकीदरम्यान ‘न्याय्य ऊर्जा संक्रमण’ या विषयावर होत असलेला परिसंवाद अक्षय ऊर्जेच्या दिशेने महत्त्वाचा ठरेल, असेही ते म्हणाले.

ही बैठक आणि इतर कार्यक्रम अक्षय ऊर्जेसंदर्भात माहिती देण्यास उपयुक्त ठरतील, असे भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेचे महाव्यवस्थापक प्रदीपकुमार दास यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला सदस्य देशांसह विशेष आमंत्रित अतिथी देश, आंतरराष्ट्रीय ऊर्जासंस्था, जागतिक बँक, भारतीय जागतिक ऊर्जापरिषद आदींचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.