संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत भारताची प्रगती
”भारताने संरक्षण क्षेत्रातील निर्यातीत गेल्या काही वर्षात उल्लेखनीय प्रगती केली आहे. केंद्र सरकारने त्यासंदर्भात राबविलेल्या महत्त्वपूर्ण योजनांमुळे हे शक्य झाले,” असे भाष्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. संरक्षणमंत्री पुणे दौऱ्यावर असून पुण्यातील ‘डीआयएटी’ अर्थात संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेच्या 12 व्या पदवीदान समारंभात त्यांच्या हस्ते स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. या सोहळ्यात राजनाथ सिंह बोलत होते.

सन २०१४ मध्ये भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात केवळ ९०० कोटी रुपये इतकी होती. केंद्र सरकारने त्यासंदर्भात घेतलेले विविध निर्णय आणि महत्त्वपूर्ण योजनांमुळे आता ही निर्यात १६ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. जग झपाट्याने बदलत असून युद्धाच्या पद्धतीदेखील बदलत आहेत.

परंपरागत युद्ध पद्धतींना समांतर अशा ‘सायबरस्पेस’च्या माध्यमातून अप्रत्यक्ष युद्धे केली जातात. अशा प्रकारच्या युद्धांना तोंड देण्यासाठी सरकारी आणि खासगी संशोधन संस्था कार्य करीत आहेत. यासंदर्भात संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्थेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संरक्षण क्षेत्र आणि नागरी क्षेत्रातील गरजा ओळखून त्यानुसार संशोधन करावे, असे आवाहन सिंह यांनी केले.