
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ एक्सप्रेसची पहिली चाचणी मंगळवारी घेण्यात आली. सकाळी 6 वाजता ठाण्याहून निघालेली ही गाडी सकाळी 10 वाजता रत्नागिरी येथे पोहोचली. ही चाचणी मडगावपर्यंत घेण्यात आली. मुंबईहून सध्या 3 ‘वंदे भारत’ ट्रेन सुरू झाल्या आहेत. मुंबई-गोवा रेल्वेची चाचणी समाधानकारक वाटल्यास लवकरच चौथी ‘वंदे भारत’ सेमी-हाय-स्पीड ट्रेन मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावर चालवली जाईल.

दरम्यान, ‘वंदे भारत’ ही अत्याधुनिक रेल्वे असून सध्या देशभरातील १४ मार्गांवर धावत आहे. महाराष्ट्रात ‘मुंबई ते अहमदाबाद’, ‘मुंबई ते साईनगर-शिर्डी’, ‘मुंबई ते सोलापूर’ आणि ‘नागपूर ते बिलासपूर’ मार्गावर ‘वंदे भारत’ धावत आहे. आता पाचवी ‘वंदे भारत’ मुंबई ते गोवा दरम्यान धावणार आहे. त्यामुळे मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या एका गाडीची किंमत सुमारे ११० कोटी आहे. प्रवासी सुविधेसाठी अपघातरोधक कवच यंत्रणा या गाडीत कार्यान्वित आहे. ही गाडी ताशी १८० ते २०० किमी वेगाने धावते. संपूर्ण डबे वातानुकूलित असून या गाडीला स्वयंचलित खिडक्या आणि दरवाजे, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा आहेत.