
आजकाल मधुमेह हा सर्वसामान्य आजार झाला आहे. तरूणही त्याचे बळी ठरत आहेत. भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मधुमेह हा असा आजार आहे, जो पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही; मात्र, आहारात सुधारणा करून त्यावर नक्कीच नियंत्रण आणता येऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी आपला आहार आणि जीवनशैली उत्तम ठेवावी. साखरेच्या वाढीमुळे शरीरातील अनेक आजारांचा धोका वाढतो.
मेथीचे पाणी हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. केवळ मधुमेह नाही तर मेथीचे पाणी कोलेस्ट्रॉल, कमकुवत प्रतिकारशक्ती, कमकुवत केस आणि त्वचेशी संबंधित समस्यांसह अनेक समस्या दूर करण्यात मदत करू शकते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही रोज सकाळी रिकाम्यापोटी मेथीचे पाणी प्यावे. मेथीमध्ये लोह, मॅंगनीज आणि खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो. मेथीदाणे स्वच्छ धुवून घ्यावेत. पिण्याच्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवावेत. त्यानंतर सकाळी हे पाणी गाळून प्यावे. असे रोज केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी खाली येईल. अनेक शारीरिक समस्याही दूर होतील.शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी हे पाणी उपयुक्त आहे.

हे पाणी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करू शकते. हे पाणी केस निरोगी ठेवू शकते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. वजन कमी करण्यात मदत होऊ शकते. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी विशेष लाभदायक आहे. मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो. वैद्यकीय सल्ल्यानुसार हा उपचार करणे कधीही चांगले!