
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जलसंधारण आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचे सर्व पाणी वाचवून भूगर्भात जिरवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2.0 या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने करायच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना, या कामांना… pic.twitter.com/8izp8cKfeS
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 17, 2023
त्यासाठी ‘जलयुक्त शिवार योजने’चा दुसरा टप्पा, ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’, ‘गाळमुक्त धरण’, ‘गाळयुक्त शिवार’ या योजना प्रभावीपणे राबवाव्यात तसेच या योजनांमधील कामांना गती देण्याचेही आदेश त्यांनी दिले. हे अभियान लोकचळवळ व्हावी, यासाठी प्रशासनाबरोबरच जलसंधारण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पावसाळा सुरू व्हायला खूप कमी वेळ उरला आहे. त्याआधी धरणे, नदी, नाले यांच्यात साचलेला गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्यासाठीच्या सूचना त्यांनी दिल्या. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारची कामे तातडीने सुरू करावीत. पाणी साठवणुकीची क्षमता असणाऱ्या जागांची निवड स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करावी. जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची कामेही तातडीने सुरू करावीत, असे त्यांनी सांगितले.