वाहतूक पोलिसांबाबत मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 55 वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 55 वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, रणरणत्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरते निवारे तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे ठाण्यातून मुंबईकडे जात असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस वयाने ज्येष्ठ असून भर उन्हात कार्यरत असल्याचे त्यांनी पहिले. त्यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना फोन करून यापुढे 55 वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश दिले. यापुढे 55 वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हाच्या जागी कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, या सुचनेमुळे वाहतूक पोलिसांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, ठाणे शहरातील सर्व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी कामे सुरु आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून ती कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत.