कोकण रेल्वेमार्गावर आजपासून वंदे भारत धावणार
मुंबईतून कोकण आणि गोव्यात जाणाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून आनंदी वार्ता आहे. कोकण रेल्वे मार्गावर आजपासून ‘वंदे भारत’ ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन धावणार आहे. मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा कंदील दाखविणार आहेत. ही गाडी नियमित धावणार असून अवघ्या 7 तासात मुंबई-गोवा प्रवास होणार आहे.

या गाडीचा वेग 180 किमी प्रति तास आहे. मंगळवारी ‘मुंबई ते गोवा’ आणि ‘गोवा ते मुंबई’ अशी ‘वंदे भारत’ गाडीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीवेळी ही गाडी मुंबईतील सीएसएमटी स्थानकावरून सकाळी 5:30 वाजता निघाली. दुपारी 12.50 वाजता गोव्याच्या मडगाव स्थानकावर पोहोचली. दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास मडगावहून निघून रात्री 8.50 वाजता सीएसएमटीला पोहोचली.

याआधी कोकण रेल्वे मार्गावर ‘जनशताब्दी’ आणि ‘तेजस’ या गाड्या धावत असून या गाड्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता त्यात ‘वंदे भारत’ सेमी-हाय-स्पीड ट्रेन या गाडीची भर पडणार आहे. ही संपूर्ण वातानुकूलित रेल्वे असून तिचा वेगही जास्त असणार आहे. या गाडीमुळे प्रवास सुखद होणार आहे. मुंबईला ही चौथी ‘वंदे भारत’ गाडी मिळणार आहे. मुंबईत आतापर्यंत मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या मार्गावर ‘वंदे भारत’ धावत आहेत.