Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

मोदींच्या हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. पुतळ्याच्या अनावरणानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आजही हिरोशिमाचे नाव ऐकून जग हादरते. ‘जी-7’ शिखर परिषदेच्या या भेटीत मला सर्वप्रथम पूज्य महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे सौभाग्य मिळाले आहे. आज जग हवामान बदल आणि दहशतवादाच्या लढाईशी झुंजत आहे. पूज्य महात्मा गांधींचा आदर्श हाच, बदलाविरुद्धचा लढा जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यांची जीवनशैली निसर्गाप्रती आदर, समन्वय आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे.” मोदींनी ट्विट करून लिहिले की, ”हिरोशिमातील ही प्रतिमा खूप महत्त्वाचा संदेश देत आहे. शांतता आणि सौहार्दाचे गांधीवादी आदर्श जागतिक स्तरावर गुंजतात आणि लाखो लोकांना बळ देतात.”

हिरोशिमा येथे त्यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, या संभाषणात प्रामुख्याने विकासाच्या क्षेत्रात मैत्री आणखी घट्ट करण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित केले आहे. यावेळी मोदींनी येथे भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली. शनिवारी दिनांक २० मे रोजी हिरोशिमा येथे क्वाड देशांची बैठक होणार आहे. बायडेन यांचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द झाल्यानंतर सिडनीतील बैठकही रद्द करण्यात आली. ‘व्हाईट हाऊस’ने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चारही देशांचे नेते हिरोशिमा येथे उपस्थित आहेत. आता ही बैठक तिथेच होणार आहे. पंतप्रधान मोदी या बैठकीत सहभागी होणार आहेत.

रशिया-युक्रेन संघर्षावर मोदी म्हणाले की, याप्रकरणी भारताची भूमिका स्पष्ट आणि अटळ आहे. भारत शांततेच्या बाजूने उभा आहे. आज संघर्षाची नव्हे, तर सहकार्याची वेळ आहे. मोदी आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही देशांचे राजनैतिक अधिकारी शक्यता पडताळून पाहत आहेत. जर मोदी आणि झेलेन्स्की हिरोशिमामध्ये भेटले, तर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट असेल.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी व्यापार, अर्थव्यवस्था व संस्कृती यासह विविध क्षेत्रात भारत-जपान मैत्री वाढविण्याच्या मार्गांवर चर्चा केली. दरम्यान, ‘जी-7’ शिखर परिषद 19 मे रोजी जपानमधील हिरोशिमा येथे अधिकृतपणे सुरू झाली. जगभरातील मध्यवर्ती बँका त्यांच्या लोकांच्या राहणीमानाचा खर्च टिकवून ठेवण्यासाठी, आक्रमक आर्थिक धोरण राखण्यासाठी आणि व्याजदर वाढवण्यासाठी संघर्ष करीत असताना ‘जी-7’ गटाची बैठक होत आहे.

कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स या 7 प्रमुख औद्योगिक लोकशाही देशांचे नेते जागतिक संबंध आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या भविष्यावर चर्चा करतील. जपाननंतर पंतप्रधान मोदी पोर्ट मोरेस्बी- पापुआ न्यू गिनीलाही भेट देणार आहेत. 22 मे रोजी भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेसाठी पापुआ न्यू गिनीला ते भेट देणार आहेत. भारताने या महत्त्वपूर्ण शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी 14 देशांचे निमंत्रण स्वीकारले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *