
खानदेशातील यावल अभयारण्य हे ‘सुकी’, ‘अनेर’ आणि ‘मांजल’ या 3 नद्या आणि त्यांना मिळणारे छोटे-मोठे नाले यांचे मनमुराद दर्शन घडविते. जळगाव जिल्ह्यातील हे एकमेव अभयारण्य आहे. यावल अभयारण्य सदासर्वदा हिरवेगार असून आणि जैवविविधतेने समृद्ध आहे. या अभयारण्याची घोषणा शासनाने 21 फेब्रुवारी 1969 रोजी केली. या अभयारण्यात वर्षभर फिरता येते. येथील ‘पाल’ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
या अभयारण्यात रानपिंगळी, गरूड, सुतारपक्षी यांच्यासह 200 हून अधिक प्रजातींचे पक्षी बघण्यास मिळतात. येथे पट्टेदार वाघाचे दर्शन होते. बिबट्याचे दर्शनसुध्दा अंगावर रोमांच उभे करते. अस्वल, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर, रानमांजर, चिंकारा, हरिण, चितळ, चौशिंग्या, सांबर आणि नीलगायीही येथे दिसतात. साग, अंजन, ऐन, शिसव, तिवस, खैर, हिरडा, बेहडा, तेंदूची झाडे येथे दाटीवाटीने उभी आहेत. या वनामध्ये बांबूही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अभयारण्याचे क्षेत्र 177.52 चौ.कि.मी आहे. अभयारण्यात आल्यावर ‘सुकी’ धरण पाहू शकता. हे धरण वन्यजीवांची तहान भागवते. चिंचाटी व्ह्यू पाँईट, पालोबा पाँईट, 5 पांडव ही शिखरे येथे आहेत.

गारबर्डी, जामन्या, गाड्या, उस्मळी, यासारखी गावे येथे आहेत. प्रामुख्याने तडवी, पावरा, कोळी, भिल या आदिवासी समाजाचे येथे वास्तव्य आहे. त्यांची पारंपरिक लोकसंस्कृतीसुध्दा येथे पाहता येते.
येथे शासकीय विश्रामगृहाबरोबर खासगी निवास व्यवस्थाही उपलब्ध आहे. येथून जवळ रावेर रेल्वेस्थानक असून ते 25 कि.मी अंतरावर आहे. भूसावळ 50 कि.मी अंतरावर आहे. पाल, रावेर, सावदा, भुसावळ ही जवळची बसस्थानके आहेत. विमान प्रवास केल्यास 260 कि.मी अंतरावर औरंगाबाद विमानतळ आहे.