
देशातील सर्वात लांब सागरी पूल २५ ते ६ मे पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक’ हा १६.५ किमी लांबीचा पूल ‘ओपन रोड टोलिंग’ प्रणाली असलेला भारतातील पहिला पूल असणार आहे. त्यामुळे मध्य मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले हा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे.
पुलाच्या डेकचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांना वाहतूकीची परवानगी देली जाईल. या पूलाची एकूण लांबी २२ किमी असणार आहे. ज्यामध्ये ५.५ किमी जमिनीवरील नाल्यांना जोडण्यात आले असून समुद्रावरील पुलाची लांबी ही १६.५ किमी असेल. या पुलावरून दोन्ही दिशांना दररोज तब्बल ७० हजार वाहने ये-जा करतील.

लोकांची वाढती गर्दी आणि त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी हा सागरी पूल तयार करण्यात आला आहे. हा पूल बांधण्यासाठी तब्बल १८००० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अधिक माहितीनुसार, ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी’कडून कर्ज घेऊन हा प्रकल्प डिझाइन आणि बिल्ड करण्यात आला आहे. या डेकच्या उद्घाटनानंतर, मुंबईच्या इतर प्रकल्पांप्रमाणे ‘मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण’ यावर लक्ष देणार आहे.
यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. मुंबईतून अवघ्या ९० मिनिटांत पुणे गाठता येणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्ग राष्ट्रीय महामार्ग ३४८ येथील चिर्ले येथे संपतो.