सुरण लागवड

‘सुरण’ ही उष्णकटिबंधीय भागातील कंदमूळ गटातील वनस्पती आहे. आशिया आणि आफ्रिका खंडात उत्पादन घेतले जाते. विशेषतः भारतातील केरळ, तामिळनाडू, गुजरात या राज्यांत आणि श्रीलंकेत सुरणाची शेती केली जाते. महाराष्ट्रात तुलनेने सुरणाची शेती मर्यादित स्वरुपात आढळते.

हे पिकाची वाढ उष्ण प्रदेशात, उबदार आणि ओलसर हवेत चांगली होते. हे पीक जास्त पाऊस सहन करू शकते. या पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. जमिनीतील आधीचे पीक निघाल्यानंतर सुरणाचे पीक घेण्यापूर्वी जमीन नांगरून त्यात शेणखत मिसळले जाते आणि मग कुळवाच्या २ ते ३ उभ्या आडव्या पाळ्या देऊन जमीन लागवडीसाठी तयार करतात.
सुरण चार हंगामानंतर म्हणजेच ४ वर्षांनी तयार होते. त्यामुळे सुरण लागवड ही सलग चार वर्ष योग्य अंतराने केली जाते. तर उत्पन्नात सातत्य राहते. सुरणाची लागवड करताना जमिनीत खड्डे करून व कोंब वरच्या बाजूस ठेवून एका ठिकाणी एकच कंद लावतात.

आवश्यकतेनुसार पिकाला ३ ते ४ वेळा खुरपणी करावी. लागवडीनंतर अंदाजे ३ महिन्यांनी मातीची भर द्यावी. त्यामुळे कंद झाकून जातात. कंदाला आधार मिळतो आणि यानंतर पुन्हा आंतर मशागत करण्याची गरज भासत नाही. या पिकाची लागवड केल्यावर लगेच पाणी दिले जाते. पण त्यानंतर मात्र जमिनीच्या पोताप्रमाणे ७ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे लागते.
सुरणाचे पीक तयार होत आहे हे ओळखण्याची अगदी सोपी पद्धत आहे. पीक तयार होताना सुरणाची पाने पिवळी पडतात. पाने पिवळी पडल्यावर पीक आपोआप वाळून जमिनीवर पडते. त्यानंतर सुरणाचे कंद कुदळीने खणून काढले जातात. त्यावरील माती आणि मुळे स्वच्छ करून काही सुरणाचे गड्डे बियाण्यांसाठी म्हणून साठवून ठेवले जातात. बाकी गड्डे विक्रीला पाठवतात.