
उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथे ‘जी-20’ देशांच्या विकासमंत्र्यांची बैठक सुरु झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली 3 दिवसांची ही बैठक होत आहे. विकास साध्य करताना समोर येणाऱ्या वाढत्या आव्हांनावर या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, या महत्त्वपूर्ण बैठकांपूर्वी ‘जी-२०’ प्रतिनिधींनी संध्याकाळी वाराणसीतील घाटांवर फेरफटका मारला. दशाश्वमेधावरील झालेल्या गंगा आरतीला हे प्रतिनिधी उपस्थित होते.
‘जी-20’ विकास मंत्र्यांच्या या बैठकीत 2 मुख्य सत्रे असतील, पहिल्या सत्रात शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सामूहिक कृती तर दुसरे पर्यावरणस्नेही जीवनशैलीवर केंद्रित असेल. या बैठकीसाठी एकूण 200 प्रतिनिधी उपस्थित आहेत. या प्रतिनिधींना जगातील सर्वात प्राचीन वाराणसी या शहराच्या समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरेचा परिचय घडवून देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने आणि सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, बैठकीपूर्वी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर काशी विद्यापीठात भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्यांबाबत आयोजित एका परिसंवादात सहभागी झाले. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या ‘जी-२०’ बैठकांकडे लोकसहभागाच्या दृष्टीने पाहिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने नैसर्गिक आपत्तीकाळात अनेक देशांना मदत केली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना संकटकाळात सरकार त्यांची सुटका करेल, असा विश्वास वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.